Shiv Sena Symbol : शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

| Updated on: Feb 17, 2023 | 7:38 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय जाहीर केलाय. या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय.

Shiv Sena Symbol : शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याच गटाला शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना बहाल केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर युक्तिवाद सुरु होता. अखेर या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय जाहीर केलाय. या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय.

“लोकशाहीचा हा विजय आहे. हा घटनेचा विजय आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे. त्यांचा संकल्प आणि विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं. मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो”, अशी पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिली. “लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व असतं. आज सत्याचा विजय आहे. शिवसेनेने जो संघर्ष केला त्याचा हा विजय आहे”, असं देखील एकनाथ शिंदे यांवेळी म्हणाले.

“बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आणि आम्ही घेतलेल्या निर्णयांशी एकरुप झालेल्या आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि लाखो शिवसैनिक यांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. या देशात बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो. आमचं सरकार नियम आणि कायद्याने स्थापन झालं. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मेरीटवर आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या.

एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जातंय.

केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी आमच्याकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी असल्याचा युक्तिवाद केला होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या वकिलांनी पक्षाची घटना, राष्ट्रीय कार्यकारणी, प्रतिनिधी सभा या बद्दलचे मुद्दे मांडत जोरदार युक्तिवाद केला होता. पण ठाकरे गटाचे हे सर्व प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आहेत.

ब्रेकिंग बातमी पाहा LIVE : 

संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

या निकालावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे अपेक्षित होतं, ज्या पद्धतीने सरकार बनवलं त्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाफ झाला हा वापर कुठपर्यंत झाला आहे. हे स्पष्ट होत आहे. हा खोक्यांचा विजय आहे. सत्याचा विजय नाही. श्रीरामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळाला, सत्यमेव जयते खोडून असत्यमेव जयते असा केला पाहिजेजो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी लाखों शिवसैनिकांनी रक्त सांडून उभा केला तो पक्ष बाजारबुनगे विकत घेतात. त्यामुळे निवडणूक आयोगावरील विश्वास जनतेने गमावला आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“या आदेशातल्या सर्व स्वायत यंत्रणा यांना गुलाम करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यातील हे पहिले पाऊल आहे. निवडणूक आयोग आहे. न्यायालय गुलाम असल्यासारखं वागत आहे. या निर्णयाला नक्कीच आव्हान दिले जाईल. चाळीस बाजार बुनगे बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह जर कुणी विकत घेणार असेल तर लोकशाही वरील विश्वास उडून गेला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाकी असतांना निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्रवर अन्याय आहे. याशिवाय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई ताब्यात घेण्यासाठीचा हा फास आहे. माझा आणि निवडणूक आयोगावर विश्वास नाही”, असंही संजय राऊत यांनी म्हंटले आहे