Festival Ticket Cost : 800 रुपयांचं भाडं दीड हजारांवर, गणेशोत्सवात खासगी ट्रॅव्हल्सकडून भरमसाट दरवाढ, परिवहन विभाग झोपेत?

| Updated on: Aug 27, 2022 | 8:16 PM

खाजगी ट्रॅव्हल्सकडून गणेशोत्सवादरम्यान भाडेवाढ केल्याच्या विरोधात मुंबईतील दादर परिसरात आंदोलन करण्यात आलं. लोकांनी निदर्शन करत घोषणाबाजी केली. नियमांच पालन न करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाईची मागणी होतेय.

Festival Ticket Cost : 800 रुपयांचं भाडं दीड हजारांवर, गणेशोत्सवात खासगी ट्रॅव्हल्सकडून भरमसाट दरवाढ,  परिवहन विभाग झोपेत?
800 रुपयांचं भाडं दीड हजारांवर
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : गणेशोत्सव (Ganesh Festival 2022) जवळ येऊ लागला की गावी जाणाऱ्यांची तयारी सुरू होते. त्यासाठी नोकरदार आधीच सुट्टीसाठी अर्ज करतात. रेल्वेचं तिकीट बुकिंग केलं जातं. काहींना सुट्ट्या मिळतात. तर काहींना ऐनवेळी सुट्ट्या दिल्या जातात. यामुळे ऐनवेळी रेल्वेचं तिकीट मिळत नाही. शेवटी खासगी ट्रॅव्हल्सनं प्रवाशांना गावी जावं लागतं. मात्र, आता खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याचं समोर आलंय. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा दरानं भाडं (Festival Ticket Cost) आकारत आहे. त्यामुळे गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना भाडेवाढ (Ticket Cost) ही एक मोठी डोकेदुखी झाली आहे. गणेशोत्सवादरम्यान खासगी ट्रॅव्हल्सकडून आकारल्या जाणार्‍या भरमसाठ तिकीट दराच्या विरोधात मुंबईच्या दादर परिसरामध्ये जाहीर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानांतर्गत हे आंदोलन दादरमध्ये करण्यात आलं.

खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाईची मागणी

खाजगी ट्रॅव्हल्सकडून गणेशोत्सवादरम्यान भाडेवाढ केल्याच्या विरोधात मुंबईतील दादर परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. लोकांनी निदर्शन करत यावेळी घोषणाबाजी देखील केली. नियमांच पालन न करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

खासगी ट्रॅव्हल्सकडे कानाडोळा?

आंदोलकांनी यावेळी खासगी ट्रॅव्हल्सकडे परिवहन विभागाकडून कानाडोळा केल्या जात असल्याचाही आरोप केलाय. प्रशासनानं जर वेळेत याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही न्यायालयीन मार्ग अवलंबणार, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिलाय. एवढंच नव्हे तर सर्व सामान्य भाविकांना प्रमाणापेक्षा जास्त भाडे आकारले जात असतील तर लोकांनी इमेल किंवा लेखी तक्रार परिवहन आयुक्तांना किंवा इतर संबंधित विभागाला करावी, असंही यावेळी सांगण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

प्रवाशांची कशी लूट केली जातेय?

  1. रत्नागिरीला जायचं असल्यास 800 रुपये नियमीत भाडे आहे. सध्या 1500 रुपये खासगी ट्रव्हल्सकडून आकारतायत
  2. सावंतवाडीला जायचं असल्यास 1500 रुपये नियमीत भाडे आहे. सध्या 2700 रुपये खासगी ट्रव्हल्सकडून आकारतायत
  3. राजापूरला जायचं असल्यास 1200 रुपये नियमीत भाडे आहे. सध्या 2000 रुपये खासगी ट्रव्हल्सकडून आकारतायत
  4. गोव्याला जायचं असल्यास 1800 रुपये नियमीत भाडे आहे. सध्या 2500 रुपये खासगी ट्रव्हल्सकडून आकारतायत

वरील माहिती आंदोलकांनी दिली आहे. तर ऑनलाइन बुकिंगमध्ये ही भाडेवाढ दुप्पट आणि तिप्पटही असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात भरमसाठ तिकिटदर आकारुन खासगी ट्रॅव्हल्सकडून भाविकांची मोठ्या प्रमाणात लुट चालू आहे. हे सर्व उघडपणे चालू असूनही त्याविरोधात राज्य परिवहन विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही, असा आरोप आंदोलांनी केला आहे.