राज्यातील तीन मोठी शहरं, पाच महत्वाच्या बातम्या

| Updated on: Dec 15, 2020 | 8:57 AM

मुंबई: राज्यातील तीन मोठ्या शहरातील पाच महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. त्यात नागपूर आणि नवी मुंबई महापालिकेनं घेतलेला महत्वाचा निर्णय, औरंगाबादेतील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, तर नाशिकमधील कोरोनाची स्थिती आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या कारवाईचा समावेश आहे. (Five important news from three big cities) नागपूर: कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागपूर महापालिका प्रशासनानं मोठा निर्णय घेतला […]

राज्यातील तीन मोठी शहरं, पाच महत्वाच्या बातम्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई: राज्यातील तीन मोठ्या शहरातील पाच महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. त्यात नागपूर आणि नवी मुंबई महापालिकेनं घेतलेला महत्वाचा निर्णय, औरंगाबादेतील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, तर नाशिकमधील कोरोनाची स्थिती आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या कारवाईचा समावेश आहे. (Five important news from three big cities)

नागपूर:

कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागपूर महापालिका प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. थकीत मालमत्ता करावारील दंड माफ करण्याचा निर्णय नागपूर महापालिकेनं घेतलाय. नागपुरातील लाखो थकबाकीदारांना महापालिकेच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नागपूर महापालिकेनं थकीत करवसूलीसाठी अभय योजना लागू केली आहे. या योजनेचा कालावधी 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत असणार आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यासंदर्भातील आदेश सोमवारी जारी केले. 31 मार्च 2020 पर्यंतच्या थकीत करावर व चालू वर्षातील कर 31 डिसेंबरपर्यंत भरणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी मनपाने ही योजना लागू केली आहे.

नवी मुंबई:

नवी मुंबई महानगरपालिकेकडूनही 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये ‘मालमत्ता कर अभय योजना’ राबवली जात आहे. यामध्ये थकित मालमत्ता कर धारकांनी आपल्या मालमत्ता कराची 25 टक्के दंडात्मक रक्कम भरल्यास त्यांची 75 टक्के दंडात्मक रक्कम माफ केली जाणार आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या योजनेची घोषणा केली आहे.

कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्याने लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असल्याने थकित मालमत्ता कर रकमेवरील शास्ती माफ करण्याची मागणीदेखील करदात्यांनी केली होती. त्यानंतर पालिकेने ‘मालमत्ता कर अभय योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.

औरंगाबाद:

औरंगाबाद शहरातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. औरंगाबाद शहरातील 11वी आणि 12वीचे वर्ग आजपासून सुरु होत आहेत. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी तसा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वी 3 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यानं 11वी आणि 12वीचे वर्ग आजपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे वर्ग अजून काही काळ बंदच राहणार आहेत.

नाशिक:

नाशिक जिल्हावासियांसाठी महत्वाची आणि सकारात्मक बातमी आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 238 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल दिवसभरात 279 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 237 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातील 3 हजार 467 रुग्णांवर उपतार सुरु आहेत. आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पाहिला असता तो 1 लाख 55 हजार 72 इतका झाला आहे. पण रुग्ण बरे होण्याची प्रमाण वाढल्यानं नाशिक जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक:

नाशिककरांसाठीच अजून एक महत्वाची बातमी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नाशिक रोडवरील सिन्नर फाटा इथल्या हॉटेल चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अवैधरित्या दारु विक्री आणि मद्यपींना बसण्याची व्यवस्था केल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी काही मद्यपींनाही अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी नवी मुंबई महापालिकेकडून अभय योजना जारी

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवरुन राज्य सरकार अडचणीत; न्यायालयाची जिल्हाधिकाऱ्यांना तंबी

Five important news from three big cities