साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटने प्रकरणात चार अधिकारी निलंबित…
मुंबईतील पावसात मॅनहोल दुर्घटनेनंतर अखेर मुंबई महानगर पालिकेने संबंधित विभागाचे चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणातील कंत्राटदारावर देखील कारवाई करण्यात आली आहे.

साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेप्रकरणात यांनी चार अधिकाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती महापौर रितु तावडे यांनी दिली आहे. या प्रकरणातील मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देखील जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असून अनेक भागात पाणी साचले आहे. मुंबईत साकीनाका येथे एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या प्रकरणाने काही वर्षांपूर्वी केईएमच्या एका डॉक्टराचा एल्फिन्स्टन येथील मॅनहॉलमधून पडून मृत्यू झाल्याच्या कटु आठवणींना उजाळा मिळाला आहे.
चेंबूर येथे झाड शाळेच्या बसवर कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असताना साकीनाका येथे ५५ वर्षीय अस्लम शेख या पादचाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, त्याला प्रचंड उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
अस्लम इसाक शेख हे साकीनाका येथील यादव नगरातील रहिवासी येथून जात असताना त्यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रायव्हेट कंत्राटदाराने या मेनहॉलचे झाकण रिपेअर करताना उघडेच ठेवल्याचे उघडकीस आले आहे. सन्मान हॉटेल आणि एस.जे. स्टुडिओ येथे हा अपघात घडला आहे. या प्रकरणात आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एल वॉर्डच्या चार अधिकाऱ्यांना या प्रकरणात जबाबदार धरुन त्यांचे निलंबन केले आहे. या प्रकरणात मृत्यू पावलेल्या पादचारी अस्लम शेख यांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत पालिकेने जाहीर केली आहे.
या प्रकरणात कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे
१) धनाजी हेर्लेकर, सहायक आयुक्त, एल विभाग
२) दीपक चौगुले, दु. अभियंता, परिक्षण, एल. विभाग
३) अभिजीत चौगुले. कनिष्ट अभियंता, एल विभाग
४ ) उत्तम पाटील, सहायक अभियंता, एल विभाग
आपण स्वत: आणि भिडे मॅडम यांनी ही सर्व कामे पावसाळ्याच्या पूर्वी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मॅनहोलला जाळ्या बसवण्याचे काम आधीच संपायला हवे होते. या प्रकरणातील कंत्राटदारावर देखील गुन्हा दाखल करणे आणि त्याला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरु असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. घडलेली घटना अतिशय दुर्देवी असून या प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष्य असल्याचे ही महापौर रितू तावडे यांनी म्हटले आहे.
