BREAKING | कुर्ला स्थानकात रेल्वे रुळावर पाणी, ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वे सेवेला मोठा फटका

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल पुन्हा एकदा पावसामुळे ठप्प झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मध्य रेल्वे मार्ग ठप्प झाला होता. त्यानंतर आज हार्बर रेल्वे मार्गाला मोठा फटका बसला आहे.

BREAKING | कुर्ला स्थानकात रेल्वे रुळावर पाणी, ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वे सेवेला मोठा फटका
Chetan Patil | Updated on: Jul 21, 2023 | 4:46 PM

मुंबई | 21 जुलै 2023 : मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल पुन्हा एकदा पावसामुळे ठप्प झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मध्य रेल्वे मार्ग ठप्प झाला होता. त्यानंतर आज हार्बर रेल्वे मार्गाला मोठा फटका बसला आहे. कुर्ला रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळात पाणी साचल्याने हार्बर रेल्वे सेवा ठप्प झाली. वडाळा ते मानखुर्द रेल्वे 2 वाजून 45 मिनिटांसापासून ठप्प होती. त्यामुळे कुर्ला रेल्वे स्थानकासह हार्बर रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी निर्माण झाली. जवळपास दीड तास प्रवाशी रेल्वे स्थानकांवर ताटकळत उभे होते. अखेर दीड तासांनी रेल्वे गाड्या पुन्हा सुरु झाला. पण रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी निर्माण झाली.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरीसह अनेक राज्यांमध्ये सध्या प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई आणि उपनगरात सुरु असलेल्या पावसामुळे आता रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झालीय. कुर्ला रेल्वे स्थानकावर हार्बल रेल्वे मार्गावर रेल्वे रुळावर पाणी साचलं. त्यामुळे जवळपास एक तासापेक्षा जास्तवेळ रेल्वे सेवा ठप्प झाली.

याशिवाय वडाळा रेल्वे स्थानकावरही हीच परिस्थिती निर्माण झाली. वडाळा रेल्वे स्थानकावर आज सकाळीदेखील अशीच परिस्थिती निर्माण झालेली. या दरम्यान काही काळासाठी पाऊस थांबला आणि पाण्याचा निचरा झाला. त्यामुळे लोकल सेवा पुन्हा सुरु झालीय. पण हार्बर रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं. त्यांना जवळपास एक तास रेल्वे स्थानकांवर लोकल ट्रेनची वाट पाहावी लागली.

वडाळ्यापासून पनवेलला जाणारी वाहतूक पुन्हा ठप्प

वडाळ्यापासून पनवेलपर्यंत जाणारी लोकल सेवा पुन्हा कोलमडल्याची माहिती समोर येत आहे. संध्याकाळी 4.34 ला जाणारी पनवेल लोकल रद्द करण्यात आलीय. 5 वाजता जाणारी पनवेल लोकल रद्द करण्यात आली. एकच पनवेल लोकल सोडल्यानंतर जाणारी पुढची गाडी रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे सीएमएमटीकडे जाणारी रेल्वे सेवा सुरु आहे. पण पनवेलच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मुंबईत पावसाचा ओघ वाढला आहे. संध्याकाळची वेळ ही चाकरमाण्यांचा घरी जाण्याची  वेळ असते. त्यामुळे लोकल ट्रेनला गर्दी असते. अशा परिस्थितीत पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली तर प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं. प्रशासनाकडून रेल्वे सेवा शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने वेळेत सुरळीत चालवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यास वाहतुकीवर परिणाम होऊ शकतात.

Follow Us