धनु्ष्यबाणाआधी शिवसेना वेगवेगळ्या चिन्हांवर वाढली, तो वारसा कायम राहणार? वाचा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह कसं मिळालं होतं, मराठी तरुणांच्या नोकऱ्यांसाठी उभी राहिलेली एक संघटना राजकीय पक्ष आणि शिवसेना म्हणून कशी नावारुपाला आली, याविषयी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

धनु्ष्यबाणाआधी शिवसेना वेगवेगळ्या चिन्हांवर वाढली, तो वारसा कायम राहणार? वाचा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Image Credit source: social media
| Updated on: Feb 19, 2023 | 12:07 AM

मुंबई : दशक होतं 1960 चं! परकियांची मुजोरी आणि स्वतःच्या राज्यातच सापत्न वागणुकीनं मराठी माणूस पिचला होता. याच पिचलेल्या-दुभंगलेल्या मराठी माणसाला एका व्यक्तीनं एकीची वज्रमूट दिली. जेमतेम देहयष्टीच्या या तरुणाचा पहाडी आवाज एका संघटनेच्या जन्माचा हुंकार देत होता. काळीज भेदणाऱ्या भाषणानं मराठी माणूस जागा होऊ लागला. छोट्या कार्यालयाबाहेर गाऱ्हाणं घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. एकीकडे जागेवर न्यायनिवाड्याची स्टाईल, दुसरीकडे कानात शिसं ओतावं असे भाषणातले धारदार शब्द आणि तिसरीकडे धारधार लेखणीनं छापलं जाणारं साप्ताहिक ‘मार्मिक’.

मराठी माणसांचा म्होरक्या बनलेल्या बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चेत येऊ लागलं. जॉर्ज फर्नांडिसविना मुंबई बंद पाडण्याचं बळ दुसऱ्या व्यक्तीच्याही मनगटात आहे. हे इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीला माहित झालं. बाळासाहेब ठाकरेंनी सुरु केलेल्या यज्ञानं मराठी माणसांना अन्यायाविरोधात पेटण्याती ताकद मिळाली. संघटनेचा व्याप वाढला. आता वेळ होती संघटनेचं बारसं करण्याची. तारीख होती 19 जून 1966…

शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची सेना. याच जयघोषानं दुसऱ्या दिवशी शिवाजी पार्कात सभा झाली. सभेत प्रबोधनकारांनी ऐतिहासिक भाषण केलं. आणि समाजकारणाबरोबर शिवसेनेनं राजकारणात पाऊल ठेवलं. संघटना म्हणून स्थापन झालेली शिवसेना राजकीय पक्ष बनली.

1968 मध्ये शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता लाभली. पण तेव्हा चिन्ह ठरलं नव्हतं, धनुष्यबाणाआधी शिवसेनेच्या नावाबरोबर फक्त डरकाळी फोडणारा वाघ असायचा. एका बाजूला शिव, मध्ये डरकाळी फोडणारा वाघ. आणि दुसऱ्या बाजूला सेना. सामान्यांच्या मनात शिवसेनेची पहिली छाप अशीच उमटली.

सुरुवातीला डरकाळी फोडणारा वाघ याच चिन्हासाठी शिवसैनिक आग्रही होते. मात्र निवडणूक आयोगात हवं ते चिन्ह मिळत नाही. त्याउलट निवडणूक आयोगच ठराविक चिन्हांचा पर्याय पक्षाला देतं. त्यातून एक पर्याय निवडणं राजकीय पक्षांना बंधनकारक असतं.

शिवसेनेसोबतचा धनुष्यबाणाचा नेमका इतिहास काय?

शिवसेनेला धनुष्यबाणच चिन्ह म्हणून का ठेवावं वाटलं? याबद्दल अनेक मतं आहेत. त्यामागे 1968 मध्ये मुंबई महापालिकेच्या प्रचाराची एक कहाणी सांगितली जाते. असं म्हणतात की त्याकाळी प्रचारात हातात धनुष्यबाण धरलेली राम-लक्ष्मणाची जोडी चर्चेत होती. प्रचारातल्या याच जोडीच्या बातम्या अनेक वृत्तपत्रातही छापून आल्या. त्या काळात असा प्रचार अनोखा होता. त्यातूनच शिवसेनेला चिन्ह म्हणून धनुष्यबाणाची कल्पना सूचली.

धनुष्यबाण शिवसेनेला 1989 साली मिळालं. त्याआधी शिवसेना जवळपास 6 वेगवेगळ्या निवडणुका धनुष्यबाणाच्या चिन्हाविना लढली. विशेष म्हणजे जी चिन्हं आज वेगवेगळ्या 6 पक्षांची आहेत. त्या सर्व चिन्हांवर शिवसेनेची कधीकाळी निवडणूक लढवून झालीय.

1970 मध्ये शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक उगवता सूर्य या चिन्हावर जिंकले. उगवत्या सूर्याचं चिन्हं आज डीएमके अर्थात द्रविड मुन्नेत्र कझगमचं आहे. मनोहर जोशी आणि सुभाष देसाईंनी कधीकाळी शिवसेनेकडून रेल्वे इंजिनवरही निवडणूक लढलीय. जे आज राज ठाकरेंच्या मनसेचं निवडणूक चिन्ह आहे.

1984 साली शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिकांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली. तेव्हा जोशी आणि महाडिक भाजपच्या कमळ चिन्हावर लढले होते. 1989 मधल्या एका निवडणुकीत शिवसेना कप-बशी चिन्हावरही लढली. जे चिन्ह गेल्या निवडणुकीत वंचित आघाडीचं होतं.

1968 साली मुंबई महापालिकेत शिवसेना ढाल-तलवारीच्या निशाणीवर लढली. शिवसेना फुटीनंतर जे चिन्ह काही काळ शिंदे गटाला मिळालं होतं. 1985 च्या विधानसभेत शिवसेनेच्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्हं भेटली. तेव्हा शिवसेनेत असलेले छगन भुजबळ मशाल चिन्हावर लढले. जे चिन्हं फुटीनंतर ठाकरे गटाला मिळालंय.

1988 आधी राजकीय पक्षांच्या चिन्हांबाबत ठोस धोरण नव्हतं. 1988 नंतर निवडणूक आयोगानं चिन्हांबाबतीत नवे नियम बनवले. त्याआधी शिवसेनेनं चिन्हासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र चिन्हासाठी आवश्यक मतांची टक्केवारी नसल्यामुळे शिवसेनेचे प्रस्ताव नाकारण्यात आले.

अखेर 1989 मध्ये शिवसेना-भाजपची युती झाली. शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढली आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेनेला धनुष्यबाणाचं चिन्ह बहाल केलं. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह म्हणून धनुष्यबाण ओळख बनली. तर वाघ हे शिवसेना या पक्षाचं चिन्ह म्हणून लोकप्रिय झालं.

धनुष्यबाण शिवसेनेच्या भात्यात येण्याआधी जितकी चिन्हं बदलली. तितकेच शिवसेनेचे राजकीय मित्रही बदलले. साल 1968. शिवसेनेची प्रजासमाजवादी पक्षासोबत युती होती. पुढे 1972 मध्ये शिवसेनेनं रा.सु.गवईंचा गट आणि मुस्लिम लीगसोबत युती केली
आणि 1976 साली मुंबई महापालिकेत काँग्रेससोबतही शिवसेनेची युती राहिली. त्यानंतर शिवसेना भाजपसोबत दीर्घकाळ राहून 2019 काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली.

Follow Us