Krishi Thapanda : अभिनेत्री कृषी थपंडाच्या घरात बिझनेसमॅनचा मृत्यू, तिने हात जोडले विनंती केली की..
Krishi Thapanda : मागच्या आठवड्यात प्रसिद्ध अभिनेत्री कृषी थपंडा हिच्या बंगळुरुतील फ्लॅटमध्ये एका बिझनेसमॅनचा मृत्यू झाला होता. त्यावर आता अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन आपल्या भावना मांडल्या आहेत.

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री कृषी थपंडा हिच्या बंगळुरुमधील राजराजेश्वरी नगर येथील फ्लॅटमध्ये बिझनेसमॅन वैशाख मृतावस्थेत आढळले होते. मागच्या आठवड्यातील या घटनेने एकच खळबळ उडाली होती. आता अभिनेत्री कृषी थपंडा पहिल्यांदाच जाहीरपणे या विषयावर बोलली आहे. तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. ‘या वेदनादायी प्रसंगावर असं जाहीरपणे बोलावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं’ असं कृषीने लिहिलय. “मला असं काहीतरी लिहावं लागेल याची मी कधी कल्पना केली नव्हती. असं काही लिहून जगासमोर ते मांडावं एवढी माझ्यात ऊर्जा नाही आणि मानसिक शक्ती सुद्धा नाहीय. मी आधी ठरवलेलं की या सर्व प्रकरणावर शांत रहायचं. पण सतत जी चर्चा सुरु आहे, सातत्याने माझ्याबद्दल, माझ्या मित्र परिवाराबद्दल, दोन्ही कुटुंबांबद्दल जे प्रश्न विचारले जातायत. त्यामुळे आता माझ्याकडे बोलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही” असं कृषी थपंडाने लिहिलय.
“जे काही घडलं, त्यात मी अशा माणसाला गमावलं, जो माझ्या ह्दयाच्या सर्वात जवळ होता, जो नेहमी माझ्यासाठी उभा राहिला, माझा बचाव केला, काही अपेक्षा न ठेवता प्रेमळ मनाने माझी काळजी घेतली. त्याच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती शब्दात मांडता येणार नाही” अशा शब्दात कृषी थपंडाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या भावना मांडल्या आहेत. दीर्घ काळापासून मनाव जे भावनिक ओझ वाहत होती, त्या बद्दलही ती बोलली.
View this post on Instagram
सर्वात वाईट ही गोष्ट आहे की…
“मी दीर्घकाळापासून दु:खात होते. आता पुन्हा एकदा माझं खूप मोठं नुकसान झालं आहे. मी माझा अंश गमावला आहे असं मला वाटतय” असं कृषीने म्हटलय. “या घटनेनंतर सतत जे बोलल जातय, जे अंदाज, चर्चा, अफवा सुरु आहेत, त्यामुळे आधीपासूनच त्रासदायक असलेली स्थिती अजून कठीण बनली आहे” असं कृषी थपंडाने लिहिलय. “सर्वात वाईट ही गोष्ट आहे की, मला दु:ख व्यक्त करण्यासाठी किंवा त्यातून सावरण्यासाठी वेळही मिळालेला नाही. त्याचं कुटुंब, मित्र परिवार, त्याच्यावर प्रेम करणारे या अकल्पनीय हानीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सतत अंदाज,चर्चा सुरु आहेत. एखाद्याच्या मृत्यूला स्टोरी बनवण्याचा प्रयत्न होतोय” असं कृषी थपंडाने म्हटलय.
.. तर त्यांच्या अश्रुंचं सुद्धा कारण बनू नका
या कठिण काळात पाठिशी उभं राहिल्याबद्दल तिने कुटुंबीय आणि मित्र परिरवाराचे आभार मानले. “एका कुटुंबाने त्यांचा मुलगा गमावलाय. मित्र परिवाराने असा माणूस गमावलाय जे त्याच्यावर शब्दापलीकडे प्रेम करत होते. या दु:खातून लोक सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. जर, तुम्ही कोणाला हसवू शकत नसाल, तर त्यांच्या अश्रुंचं सुद्धा कारण बनू नका. एखाद्याला तु्म्ही जगण्याचं कारण देत नसाल तर कमीत कमी अपेक्षा सोडून देण्याच कारण बनू नका” असं कृषीने लिहिलय. कृषीने ही पोस्ट करताना तिचं कमेंट सेक्शन बंद केलं आहे. “मी विनवणी करते हे सर्व थांबवा” असं तिने पोस्टच्या शेवटी म्हटलं. उद्योगपती वैशाख यांनी कृषी थपंडाच्या बंगळुरुतील घरात आपलं जीवन संपवलं. ते नैराश्याचा सामना करत होते.
