महाधिवक्त्याशी बोलेन, पण तुम्ही संप मागे घ्या; अनिल परब यांचं एसटी कामगारांना पुन्हा आवाहन

| Updated on: Nov 20, 2021 | 7:20 PM

एसटी कामगारांचा संप मिटावा म्हणून एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी मला राज्याच्या महाधिवक्त्याशी चर्चा करायला सांगितलं आहे. मी महाधिवक्त्याशी चर्चा करेन.

महाधिवक्त्याशी बोलेन, पण तुम्ही संप मागे घ्या; अनिल परब यांचं एसटी कामगारांना पुन्हा आवाहन
अनिल परब, परिवहन मंत्री
Follow us on

मुंबई: एसटी कामगारांचा संप मिटावा म्हणून एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी मला राज्याच्या महाधिवक्त्याशी चर्चा करायला सांगितलं आहे. मी महाधिवक्त्याशी चर्चा करेन. पण एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन करतानाच विलिनीकरणाची प्रक्रिया एक दोन दिवसात होणारी नाही. समितीचा अहवाल आल्यावरच त्यावर निर्णय घेता येईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

आज एसटी संघटनेचे पदाधिकारी गुजर आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अनिल परब यांची भेट घेऊन एसटी कामगारांच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मीडियाशी बोलताना परब यांनी हे आवाहन केलं. तुम्ही वकील आहात. तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया माहीत आहे. कोर्टाने जी समिती स्थापन केली. तिला पूर्ण अधिकार दिले आहे. अभ्यास करून अहवाल सादर करावा. कोर्टाने निर्णय दिलेले असताना त्यात फेरफार करता येणार नाही. समितीचा जो काही अहवाल असेल त्यावर आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ असं मी त्यांना सांगितलं, असं परब म्हणाले.

विलिनीकरणाची प्रक्रिया एक-दोन दिवसाची नाही

यावेळी एसटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अॅडव्होकेट जनरलशी बोलून घ्या असं सांगितलं. अॅडव्होकेट जनरल यांनाही या संपाची माहिती आहे. मी महाधिवक्त्याशी बोलेन पण तुम्ही संप घ्या. कारण लोकांची अडवणूक होते, त्यांना त्रास होत आहे. विलिनीकरणाची प्रक्रिया एक दोन तीन दिवसात होत नाही. त्यासाठी कमिटीला योग्य ती वेळ दिला आहे. त्या वेळेतच काम होईल. त्या व्यतिरिक्त काही मुद्दे असतील तर चर्चा करायला तयार आहे, असं मी त्यांना सांगितलं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ताणू नका, संप मागे घ्या

सरकारला कोणत्याही कर्मचाऱ्यांचं नुकसान करायचं नाही. पण आम्ही जनतेलाही बांधिल आहोत. पर्यायी व्यवस्था देण्याची आमची जबाबदारी आहे. त्यामुळे जास्त ताणू नका. लवकरात लवकर संप मागे घ्या, चर्चा करून या प्रश्नाचं उत्तर शोधू असं आवाहन या प्रतिनिधींना केल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा करण्याची तयारी या प्रतिनिधीं दर्शविल्याची माहितीही त्यांनी दिली.

काही लोक राजकारण करत आहेत

आम्ही आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही. पण विलिनीकरणाचा मुद्दा हा समितीच्या माध्यमातूनच सोडवला जाईल. आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण कुणाच्या संगण्यावरून किंवा भडकवण्यावरून आंदोलन करू नये. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं तर हे कोणीही नेते येणार नाहीत. या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा उद्देश नाही. परंतु, राजकारण करण्यासाठी काही लोक भडकवत आहेत, राजकारणासाठी काही लोक कामगारांना उचकवत आहेत. तुमच्या न्याय मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही नुकसान करून घेऊ नका, असंही त्यांनी सांगितलं.

पोळी भाजा, पण…

मी कामगाराशी लढा देऊ इच्छित नाही. ते माझेच कामगार आहेत. त्यांच्या भावना भडकलेल्या आहेत. त्या मी समजू शकतो, असं सांगतानाच राजकीय पोळी भाजा. पण पोळी करपणार नाही याची काळजी घ्या, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. विलिनीकरणाचा मुद्दा सोडून कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास आम्ही तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं…’ आझाद मैदान दुमदुमले, कोणत्याही परिस्थितीत परबांच्या बंगल्यावर धडक देणारच; एसटी कामगार इरेला पेटले

भाजपच्या रक्तातच मुस्लीम बांधवांविषयी विष, जनतेनं त्यांना जाब विचारावा: दत्तात्रय भरणे

बबनराव लोणीकरांची जीभ घसरली, टोपेंना म्हणाले हरामखोर, जालन्यात गुन्हा दाखल!