Maharashtra Lockdown: मला लोकांना घाबरवयाचं नाही, पण इंग्लंडमधला दुसरा लॉकडाऊन 92 दिवस लांबला होता: डॉ. संजय ओक

| Updated on: Apr 20, 2021 | 11:15 AM

एप्रिल महिन्यातील शेवटचे तीन दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या तीन दिवसांतील रुग्णसंख्येवर लॉकडाऊन आणखी किती काळ लांबेल, हे निश्चित होईल. | Sanjay Oak Maharashtra Lockdown

Maharashtra Lockdown: मला लोकांना घाबरवयाचं नाही, पण इंग्लंडमधला दुसरा लॉकडाऊन 92 दिवस लांबला होता: डॉ. संजय ओक
डॉ. संजय ओक, कोव्हिड टास्क फोर्स प्रमुख
Follow us on

मुंबई: राज्यातील नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करुन कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणला नाही तर महाराष्ट्रात दीर्घकाळ लॉकडाऊनची (Lockdown) अंमलबजावणी करावी लागेल, अशी भीती कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक (Sanjay Oak) यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी इंग्लंडचे उदाहरण दिले. इंग्लंडमध्ये जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला दुसरी लाट आल्यानंतर देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला होता. मला लोकांना घाबरावायचे नाही. मात्र, इंग्लंडमधला हा लॉकडाऊन 92 दिवस लांबला होता. महाराष्ट्रावर तशी परिस्थिती येऊ नये म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात आणला पाहिजे, असे मत संजय ओक यांनी व्यक्त केले. (Covid Task force chief Sanjay oak on coronavirus situation in Maharashtra)

डॉ. संजय ओक यांनी मंगळवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन, लसीकरण आणि नागरिकांची स्वयंशिस्त या त्रिसूत्रीच्या जोरावरच कोरोनाची दुसरी लाट परतवता येणे शक्य असल्याचे सांगितले. नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले आणि वेगाने लसीकरण केले तर आपण लवकर यामधून बाहेर पडू. एप्रिल महिन्यातील शेवटचे तीन दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या तीन दिवसांतील रुग्णसंख्येवर लॉकडाऊन आणखी किती काळ लांबेल, हे निश्चित होईल, असे संजय ओक यांनी म्हटले.

‘जून महिन्याच्या अखेरपर्यंत वेगाने लसीकरण झाले तर यंदाच्या वर्षातच भारत कोरोनामुक्त होईल’

केंद्र सरकारने सोमवारी 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला होता. आता हे लसीकरण वेगाने झाले पाहिजे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत भारतामधील बहुसंख्य लोकसंख्येला लस मिळाली तर या वर्षाच्या अखेरपर्यंत भारत कोरोनामुक्त होऊ शकतो, असा दावा डॉ. संजय ओक यांनी केला.

मात्र, त्यासाठी वेगाने लसीकरण झाले पाहिजे. एक दिवस लसीचा साठा आला आणि दुसऱ्या दिवशी तो मिळालाच नाही, असे होता कामा नये. महाराष्ट्रात लसीकरणासाठी टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी नवी रणनीती आखली आहे. हा अहवाल आम्ही राज्य सरकारला सोपवल्याचे डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

डॉक्टर आणि नर्सेस आता पूर्णपणे थकलेत: संजय ओक

गेल्या वर्षभरापासून राज्यातील डॉक्टर्स आणि परिचारिका (नर्सेस) अविरतपणे काम करत आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेतील हे कर्मचारी पूर्णपणे थकले आहेत. नेहमीच्या रुग्णांवर उपचार करा, कोरोना रुग्णांकडे बघा आणि लसीकरणही करा, अशी तिहेरी जबाबदारी ते आता पेलू शकत नाहीत.

त्यामुळे आता लसीकरणाच्या मोहिमेत मोठ्याप्रमाणावर स्वयंसेवकांना सहभागी करून घ्यायला हवे. त्यासाठी NSS आणि इतर उपक्रमांतील स्वयंसेवकांची मदत घेतली जावी. हे स्वयंसेवक लसीकरण केंद्रांवर लॉजिस्टिक्सची संपूर्ण जबाबदारी सांभाळतील. आम्ही त्यांना काही दिवसांचे प्रशिक्षण देऊ. तर लस देण्याचे काम हे आरोग्य कर्मचारी पार पाडतील, असा प्रस्ताव डॉ. संजय ओक यांनी मांडला.

संबंधित बातम्या:

Lockdown: राज्यात आणखी कठोर लॉकडाऊन अटळ, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा?

Maharashtra Corona Update : रुग्णसंख्येत घट, चिंता मात्र कायम! दिवसभरात 58 हजार 924 नवे रुग्ण, 351 जणांचा मृत्यू

1 मेपासून तरुणांनाही लस; नोंदणी कशी कराल, खर्च किती?, एका क्लिकवर सर्व माहिती

(Covid Task force chief Sanjay oak on coronavirus situation in Maharashtra)