मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, मराठवाड्यासाठीही पुढील 48 तास महत्त्वाचे

| Updated on: Sep 04, 2019 | 7:17 PM

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह जिल्ह्यात गुरुवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, मराठवाड्यासाठीही पुढील 48 तास महत्त्वाचे
Follow us on

पुणे : राज्यात दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभाग, पुणे (IMD rain prediction) यांच्या माहितीनुसार, कोकण आणि गोव्यात पुढील पाच दिवस जोरात पाऊस पडणार आहे. तर राज्यात पुढील 48 तास जोरदार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा (IMD rain prediction) अंदाज आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह जिल्ह्यात गुरुवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

राज्यात बुधवारी आणि आणि गुरुवारी चांगला पाऊस पडेल. मोठ्या पावसाची प्रतीक्षा असलेल्या मराठवाड्यातही पुढील 48 तास चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात सहा ते आठ तारखेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असं हवामान विभागाने म्हटलंय.

पुणे जिल्ह्यात बुधवारपासून घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विशेषतः घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक, सातारा आणि कोल्हापुरात घाटमाथ्यावर बुधवारी जोरदार पावसाचा इशारा आहे. मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

कोकण, गोवा आणि मुंबई जिल्ह्यात अत्यंत जोरदार पाऊस पडेल. इथे 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल. गुरुवारीही मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज आहे. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस पडेल.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग पुढील पाच दिवस पाऊस पडेल . इथं काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

मुंबईत दिवसभर कोसळधार

मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाने धुमाकूळ घातलाय. मुंबईत लोकल वाहतुकीचाही यामुळे बोजवारा उडाला. तर पालघर आणि रायगड जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटलाय. विविध ठिकाणी रस्त्यांवरही पाणी आहे.