
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगो एअरलाइन्सची (IndiGo Airlines) विमाने सध्या वेळेवर उडत नसल्यामुळे देशभरातील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सध्या इंडिगोच्या विमानांना खूप उशीर होत आहे. तसेच काही विमाने थेट रद्द केली जात आहेत. यामुळे अनेक प्रवाशांना एअरपोर्टवरच रात्र काढावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अडकलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मुंबई विमानतळ प्रशासनाने तातडीने अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
इंडिगोच्या विमानाच्या गोंधळाचा परिणाम नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरही झाला आहे. मुंबई आणि पुण्याहून नागपूरला येणाऱ्या विमानांना उशीर होत असल्यामुळे मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना त्रास झाला आहे. त्यामुळे आता अनेक जण समृद्धी महामार्गाचा वापर करून नागपूरला दाखल होत आहे. या गोंधळामुळे इतर कंपन्यांच्या विमानांचे तिकीट दर खूप वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या इंडिगोच्या झालेल्या गोंधळामुळे उपचारासाठी मुंबईला आलेल्या एका कर्करोगग्रस्त महिलेला अडकून राहावे लागले. ही महिला मुंबईच्या टाटा रुग्णालयात आपल्या मुलासोबत आली होती. मात्र ५ तारखेपासून विमान रद्द झाल्यामुळे तिला मुलासोबत एअरपोर्टवर अडकून राहावे लागले आहे. याबद्दलची माहिती इंडिगोला मिळताच त्यांनी या महिलेची समस्या लवकर सोडवली जाईल, अशी माहिती दिली आहे.
तसेच मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) अडकलेल्या लोकांसाठी एअरपोर्ट प्रशासनाने खास सुविधा सुरू केल्या आहेत. यावेळी अनेक प्रवाशांसाठी एअरपोर्टवर अतिरिक्त खुर्च्या लावून बसायची चांगली सोय केली आहे. तर ज्या लोकांचे फ्लाईट उशिरा आहेत, त्यांना एअरपोर्ट प्रशासनातर्फेत नाश्ता आणि रिफ्रेशमेंट (चहा-पाणी) दिले जात आहे. तसेच लोकांना माहिती देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी जास्त अधिकारी आणि कर्मचारी (CSE) नेमण्यात आले आहेत. त्यासोबतच एअरपोर्टवरील दुकानांना जास्त जेवण आणि पाण्याची व्यवस्था करुन ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यासोबतच ज्यांची विमाने रद्द झाली, त्यांना लवकर बाहेर जाता यावे, यासाठी वेगळे गेट्स सुरू केले आहेत. लोकांना ताजी माहिती देण्यासाठी हेल्प डेस्क २४ तास सुरू ठेवण्यात आला आहे. तसेच एअरपोर्टवर सतत साफसफाई करण्यासाठी जास्त कर्मचारी लावण्यात आले आहेत. तसेच महिलांसाठीची स्वच्छतागृहे आणि बेबी केअर रूम्सच्या स्वच्छतेकडे खास लक्ष दिले जात आहे. त्यासोबत रद्द झालेल्या विमानांचे चेक-इन केलेले सामान प्रवाशांना लवकर मिळावे यासाठी एअरपोर्टने खास टीम तयार केली आहे.
तसेच याबद्दल इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. आज सकाळपासून विमानांची उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत. हळूहळू सगळी कामे सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. सध्या आमच्याकडे येणाऱ्या तक्रारी कमी झाल्या आहेत. आता लवकरच सर्व काही पूर्वपदावर येईल, अशी माहिती इंडिगोने दिली आहे.