अमली पदार्थविरोधी कारवाईत राष्ट्रवादीकडून अडथळा; भाजपचा आरोप

| Updated on: Oct 18, 2021 | 4:28 PM

राज्यात अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई सुरू झालेली असतानाच राष्ट्रवादीकडून मात्र या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. (keshav upadhye slams ncp over ncb raids)

अमली पदार्थविरोधी कारवाईत राष्ट्रवादीकडून अडथळा; भाजपचा आरोप
keshav upadhye
Follow us on

मुंबई: राज्यात अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई सुरू झालेली असतानाच राष्ट्रवादीकडून मात्र या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला चढवला. अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आपल्या जावयाचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तंबाखू, गुटखा अशा पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वनस्पती असल्याचे सांगत मलिकांची री ओढत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून अमली पदार्थ विरोधात सुरु असलेल्या कारवाईत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची टीका उपाध्ये यांनी केली.

पवारांकडून मलिकांची पाठराखण

अतिवृष्टीमुळे हतबल झालेले मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. याखेरीजही महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. त्यावर सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने बोलणे अपेक्षित आहे. मात्र मलिक हे आपल्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडली, अमली पदार्थ सापडले नाहीत यासारखी सफाई देण्यासाठी वारंवार पत्रकार परिषदा घेत आहेत. आपल्या जावयाचे केविलवाणे समर्थन करणाऱ्या मलिक यांना राज्यापुढे अन्य महत्वाचे प्रश्नच नाहीत असे वाटत असावे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना तंबाखू, गुटखा वगैरे पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव असताना तेही मलिक यांचीच री ओढत आहेत, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीकडून प्रश्नचिन्हं

अमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असताना अमली पदार्थ विरोधी मोहिमेला पाठिंबा देण्याची गरज आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्या काही दिवसांत सातत्याने अमली पदार्थ विरोधी मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत अडथळे आणण्याचाच हा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

डिसेंबरमध्ये मुंबईत राजकीय भूकंप? भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार, यशवंत जाधवांचा दावा

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं; साध्वी कांचन गिरी यांची टीका

अतिवृष्टीमुळे सारं पीक वाहून गेलं, डोक्यावर कर्जाचा डोंगर, भरलेला संसार अर्ध्यावर सोडून बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

(keshav upadhye slams ncp over ncb raids)