पुण्यापासून अहिल्यानगर, कोकणापर्यंत दावे प्रतिदावे आणि रस्सीखेच… कुठे कुठे घडतंय महानाट्य?

Local Body Vidhan Parishad Election 2026 Mahayuti: स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा तिढा लांबतच चालला आहे. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत दावे-प्रतिदाव्यांनी पेच वाढला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आता दिल्ली वारी होणार का? याची चर्चा सुरू आहे.

पुण्यापासून अहिल्यानगर, कोकणापर्यंत दावे प्रतिदावे आणि रस्सीखेच... कुठे कुठे घडतंय महानाट्य?
चांद्यापासून ते बांद्यापर्यंत निवडणुकीसाठी रस्सीखेच
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 27, 2026 | 11:05 AM

Local Body Vidhan Parishad Election 2026 Mahayuti: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतील जागा वाटपावरून सध्या महायुतीत वाद पेटला आहे. शिवसेना भाजपच्या फॉर्म्युल्यावर राजी नाही. एकूण १७ जागांपैकी भाजपने १२ जागांवर दावा सांगितला आहे. तर शिंदेसेनेला ७ जागा हव्या आहेत. राष्ट्रवादीचा तीन ते चार जागांवर दावा असल्याचे समजते. तर १४ ठिकाणी भाजपला बहुमत असल्याचा दावा आहे. त्यातून पेच वाढला आहे. राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत काय आहे स्थिती? कुठे पेच तर कुठे रस्सीखेच?

रत्नागिरीत महायुतीत रस्सीखेच

रत्नागिरी विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात राजकीय रंगत वाढली आहे. महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच असताना शिंदे शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. रत्नागिरीतल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून दोन अर्ज विकत घेतल्याची माहिती समोर येत आहे. तर उद्धव ठाकरे सेनेकडून माजी आमदार बाळ माने यांनी चार अर्ज घेतले.

तर या निवडणुकीत रायगडमधील शेतकरी कामगार पक्ष देखिल उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. शेकापकडून चार उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती समोर येत आहे. अरविंद म्हात्रे आणि अनिल चोरडा यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. विधानसभेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महायुतीचे पारडे जड आहे. शिंदे शिवसेनेकडे सर्वात जास्त म्हणजे ३०५ मतदार आहेत. त्याखालोखाल भाजपकडे २७६ आणि अजित पवार राष्ट्रवादीकडे १२७, उद्धव ठाकरे सेनेकडे ५५ तर काँग्रेसकडे ५० मतदार आहेत. सर्वात जास्त मतदार रायगडमध्ये ५१८ रत्नागिरी जिल्ह्यात २७७ तर सिंधुदूर्गात २२३ मतदार आहेत. महायुतीक़डे एकत्र आल्यास ७०८ मतांची मॅजिक फिगर आहे. पण शह काटशह याच्या राजकारणात कुणाचे पारडे जड राहणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

पुणे विधान परिषदेची जागेसाठी भाजप आग्रही

पुणे विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी यासाठी जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी केल्याचे समजते. शहर आणि जिल्ह्यात पक्षाची वाढलेली ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्पष्ट संख्याबळ आणि मित्रपक्ष व स्थानिक आघाड्यांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार राहुल कुल, हेमंत रासने, सुनील कांबळे, शंकर जगताप, भीमराव तापकीर, माजी आमदार संजय जगताप, बाळा भेगडे, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी फडणवीस यांची भेट घेतली.

अहिल्यानगरची जागा भाजपला द्या

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीच मोठं मताधिक्य आहे. जास्त मतदान भाजपचे असल्याने ही जागा भाजपला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे, ते यशस्वी होतील अशी माहिती राम शिंदे यांनी दिली.भाजपकडे तोला मोलाचे उमेदवार आहेत. ही निवडणूक महायुतीच्या बाजूने झुकेल. वेगळा निर्णय देखील या निवडणुकीत होऊ शकतो, मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी दिली.

शिवानी वडेट्टीवार निवडणूक लढवणार?

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र नाव आघाडीवर असताना आता अचानक त्यांच्या संभाव्य माघारीच्या चर्चेमुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवाराचे किमान वय ३० वर्षे असणे आवश्यक असल्याची तरतूद आहे. त्यामुळे शिवानी वडेट्टीवार यांच्या वयावरूनही आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, भाजपकडून अरुण लाखानी यांचे नाव उमेदवारीसाठी अंतिम असल्याचे म्हटले जाते. यामुळे भाजपने निवडणुकीत आघाडी घेतल्याची भावना राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. सध्या काँग्रेसकडून उमेदवाराच्या नावाबाबत अधिकृतपणे मौन राखले जात असले, तरी राजकीय वर्तुळात आता शिवानी वडेट्टीवार यांच्या खेळीबाबत चर्चा रंगत आहेत.

Follow Us