औरंगाबादच्या नामांतरावर तोडगा निघणार?; अजितदादा, थोरात आणि देसाईंमध्ये खलबतं सुरू

| Updated on: Jan 12, 2021 | 6:36 PM

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत सुरू असलेल्या कुरबुरीवर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Maha Vikas Aghadi samanvay samiti Meeting Begins)

औरंगाबादच्या नामांतरावर तोडगा निघणार?; अजितदादा, थोरात आणि देसाईंमध्ये खलबतं सुरू
Follow us on

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत सुरू असलेल्या कुरबुरीवर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत महापालिका निवडणुका, महामंडळ नियुक्त्यांसह औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (Maha Vikas Aghadi samanvay samiti Meeting Begins)

महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची वैठक सुरू झाली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित आहेत. राज्यातील औरंगाबादच्या नामांतर वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्यात पाच महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस नेत्यांची परस्पर विधाने येत आहेत. त्यामुळे या बैठकीत पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात येणार आहे. तसेच सरकारला एक महिना झाला तरी अजूनही महामंडळांच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत सत्तेची फळं चाखायला मिळालेली नाहीत. त्यामुळे तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते नाराज असून महामंडळांवरील या नियुक्त्यांबाबतही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात औरंगाबादच्या नामांतरावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये परस्पर विरोधी विधाने सुरू आहेत. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. तर या नामांतराला काँग्रेसने विरोध केला आहे. किमान समान कार्यक्रमात नामांतराचा मुद्दा नव्हता असं सांगत काँग्रेसने शिवसेनेची कोंडी केली आहे. तर किमान समान कार्यक्रम सेक्युलर विचारावर आधारीत असून औरंगजेब हा सेक्युलर नव्हता, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तर, बैठक सुरु होण्यापूर्वी अजित पवार यांनी या वादावर तोडगा काढण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या संपूर्ण पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं मन वळवण्यात सुभाष देसाईंना यश मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Maha Vikas Aghadi samanvay samiti Meeting Begins)

 

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

अजूनही वेळ गेली नाही, केंद्र सरकारने वेळीच कायदे मागे घ्यावेत : नवाब मलिक

‘त्या’ विधानावरून राष्ट्रवादीच्या आमदारांचं राम कदमांवर टीकास्त्र; रोहित पवार म्हणतात…

(Maha Vikas Aghadi samanvay samiti Meeting Begins)