राज्यातील 5 जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येमुळं टेन्शन कायम, सर्वाधिक सक्रिय रुग्ण ‘या’ जिल्ह्यात

| Updated on: Aug 28, 2021 | 11:47 AM

राज्य सरकारकडून कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, यासाठी नागरिकांनी कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे.

राज्यातील 5 जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येमुळं टेन्शन कायम, सर्वाधिक सक्रिय रुग्ण या जिल्ह्यात
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतून सावरताना दिसत आहे. राज्य सरकारकडून कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, यासाठी नागरिकांनी कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे. राज्यातील कोरोना विषाणू संसर्ग कमी होत असताना पाच जिल्ह्यांनी टेन्शन वाढवलं आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, सागंली आणि ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यातील कोरोनाची स्थिती कशी?

महाराष्ट्रात 27 ऑगस्टला 4654 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 170 रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर आता 2.12 टक्केवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील 62 लाख 55 हजार 451 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनामुक्तीचा दर आता 97.02 टक्के वर पोहोचला आहे.

राज्यातील ‘या’ पाच जिल्ह्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण

महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, सांगली, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या 13715 सक्रिय रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात 7082, साताऱ्यात 5254 , सांगली जिल्ह्यात 4876 आणि अहमदनगर जिल्ह्यात 5295 सक्रिय रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची रुग्णसंख्या 64 लाख 47 हजार 442 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी 62 लाख 55 हजार 451 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. तर, राज्यातील कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 36 हजार 900 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 51 हजार 574 वर पोहोचला आहे.

मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या किती?

राज्याच्या राजधानीत सध्या 3021 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर, मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या 7 लाख 42 हजार 763 वर पोहोचली आहे. तर, मुंबईत 15 हजार 968 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

 1 कोटी लसीकरण

भारतात सध्या कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम सुरु आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये 27 ऑगस्टला 1 कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. भारतातील कोरोना लस घेतलेल्यांची लोकसंख्या आता 62 कोटींवर पोहोचली आहे.

देशातील कोरोना रुग्णसंख्या

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांत मिळून नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये तब्बल 21 हजारांची वाढ झाली असताना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 44 हजार 658 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 496 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. गेल्या 24 तासात भारतात 44 हजार 658 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 496 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 32 हजार 988 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

इतर बातम्या:

अकरावी प्रवेशाचं टेन्शन दूर, शिक्षण विभागाकडून मोबाईल ॲपची निर्मिती, वर्षा गायकवाड यांच्याकडून घोषणा

मी इम्पलसिव्ह आयुष्य जगत नाही, माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही; सुप्रिया सुळेंची जोरदार बॅटिंग

Maharashtra Corona Update five district active corona cases raised tension know details