धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर… CJP चा प्लॅन बी काय? आशुतोष रांकाने भात्त्यातून काढला बाण
CJP Protest Dharmendra Pradhan Resign: कॉक्रोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी नुकसान भरपाई आणि कायदेशीर मुद्यावर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला आहे.

CJP Protest Dharmendra Pradhan Resign: केंद्र सरकारसोबत काल कॉक्रोच जनता पार्टीच्या द्विसदस्यीय शिष्टमंडळाने चर्चा केली. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंग यांच्यासोबत रांका आणि सौरभ दास यांनी चर्चा केली. आज पुन्हा बैठक होणार आहे. CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले की, नुकसान भरपाई आणि कायदेशीर प्रकरणात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अद्याप कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. जर सरकारने प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठोस आश्वासन दिले नाही तर या बैठकांना काहीच अर्थ उरत नसल्याचे सणसणीत उत्तर रांका यांनी दिले. पक्ष पुढील रणनीतीवर काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भरपाई आणि कायदेशीर कारवाईबाबत सकारात्मक प्रतिसाद
आशुतोष रांकाने सांगितले की कालच्या बैठकीत सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी नुकसान भरपाई आणि कायदेशी कारवाईबाबत ठोस आश्वासन दिले. नीट प्रश्नपत्रिका फुटीनंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, त्यासंदर्भात हे आश्वासन देण्यात आले. सरकारने लेखी आश्वासन दिले आहे. अनेक मुद्यांवर सरकारचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचे रांका यांनी स्पष्ट केले. आज चर्चेची दुसरी फेरी होईल. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची CJP ची जी मुख्य मागणी आहे, ती अद्याप अपूर्ण असल्याचे रांका यांनी स्पष्ट केले.
सरकारला CJP चा कडक इशारा
CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते रांका यांनी सरकारला कडक इशाराही दिला आहे. सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याविषयी वेळकाढूपणा केला तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. सरकार जर आमच्या मुख्य मागण्यांकडे कानाडोळ करेल तर मग संघटनेला आंदोलन तीव्र करण्याशिवाय पर्याय नसेल असे रांका यांनी बजावले.
47 NTA अधिकारी हटवले
सरकारने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमधील NTA मधील 47 अधिकारी हटवले आहेत. त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आली आहे. सीजेपीच्या आंदोलनाचा हा मोठा परिणाम मानल्या जातो. त्यावरही आशुतोष रांका यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारच्या कृतीचे त्यांनी कौतुक केले. पण मूळ प्रश्न यामुळे सुटलेला नसल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची अंतिम जबाबदारी ही शिक्षणमंत्र्यांची आहे. कारण NEET प्रश्नपत्रिका फुटली आणि त्यानंतर देशात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्याची थेट जबाबदारी ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कॉक्रोच जनता पार्टी ठाम असल्याचा संदेश त्यांनी दिला. जर सरकारने ऐकले नाही तर मग आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.
