Corona | महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या सीमा आणखी काही दिवस बंदच, ठाकरे सरकारचा निर्णय

| Updated on: May 05, 2020 | 7:07 AM

रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यावर सरकारचा भर आहे.

Corona | महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या सीमा आणखी काही दिवस बंदच, ठाकरे सरकारचा निर्णय
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच, हळूहळू आर्थिक व्यवहाराला चालना देण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यावर सरकारचा भर आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील प्रवासावर अजूनही निर्बंध आहेत, जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहतील, असे राज्य शासनाने स्पष्ट कले आहे.

कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी एकल दुकाने सुरु करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असली तरी साथरोग नियंत्रण कायद्यानुसार दिलेल्या अधिकारानुसार स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी अथवा महानगरपालिका आयुक्त दिलेल्या सवलतीबाबत वेगळा निर्णय घेऊ शकतात. तसे करताना ते अधिकची सवलत देऊ शकत नाहीत, पण राज्य शासनाने दिलेली सवलत सकारण नाकारु शकतात, असेही सरकारने स्पष्ट केले.

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मे रोजीपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाने सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकाने सुरु करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात दुकानदार आणि नागरिकांमध्ये संभ्रम राहू नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने शासनाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी पत्रकारांच्या शंकांचे निरसन केले.

राज्य शासनाच्या आदेशानुसार, शहरी भागात महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीमधील मॉल्स, बाजार संकुल आणि बाजारातील जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद राहतील. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागात सर्व प्रकारची स्वतंत्र एकल दुकाने, कॉलनी दुकाने आणि निवासी संकुलातील दुकाने सुरु करता येतील.

क्षेत्रातील स्वतंत्र दुकाने, कॉलनी दुकाने आणि निवासी संकुलातील दुकाने असे दुकान स्थित असलेल्या गल्ली/रस्त्यावर अत्यावश्यक वस्तू विक्री दुकानांव्यतिरिक्त व्यवहार सुरु असलेल्या इतर दुकानांमध्ये जास्तीतजास्त 5 दुकाने चालु करण्यास अनुमती दिली आहे. मात्र, एका लेनमधील कुठली पाच दुकाने सुरु करावीत, यासंदर्भात त्या भागातील दुकानदारांनी आपआपसात ठरविल्यास चांगले होईल. मात्र, तसे न करता आल्यास यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका आयुक्त हे निर्णय घेतील, असे गगराणी यांनी सांगितले.

नागरिकांनी अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये

जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने सुरु केल्यानंतर होणारी गर्दी टाळण्यासाठी योग्य ती काळजी प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यकता असल्याशिवाय खरेदीसाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

राज्य शासनाने सध्या कंटेनमेंट झोनमधील प्रादुर्भाव कमी करण्यावर भर दिला आहे. प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातून ग्रीन अथवा ऑरेंजझोनमधील जिल्ह्यात प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा आणखी काही दिवस बंद राहणार आहेत. मात्र, वैद्यकीय कारणामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास परवानगी देण्यात येत असून आतापर्यंत अशा कारणांसाठी 56 हजार 600 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.

मजुरांच्या स्थलांतरासाठी योग्य ती काळजी

परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी राज्य शासनाने योग्य ती काळजी घेतली आहे. ज्या राज्यांना अशा मजुरांना घेण्यास मंजुरी दिली आहे, अशा राज्यातील मजुरांना रेल्वे अथवा खासगी बसेसद्वारे त्या त्या राज्यात पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत 35 हजार मजुरांना इतर राज्यात पाठविण्यात आले आहे. मजुरांना पाठविताना त्यांची योग्य ती तपासणी करुन पाठविण्यात येत आहे. तसेच, विविध राज्यांशी मजुरांच्या स्थलांतरासंदर्भात सातत्याने चर्चा सुरू आहे.

आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपाय योजना

लॉकडाऊन झाल्यानंतर वस्तू आणि सेवा कर, मुद्रांक शुल्क, उत्पादन शुल्क येणे बंद झाल्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती प्रभावीत झाली आहे. कोरोनामुळे जिवीतहानी कमी करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. त्यानंतर आर्थिक स्थिती सुधारण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे आता टप्प्या टप्प्याने आर्थिक व्यवहार सुरू करण्यात येत आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काय उपाययोजना कराव्या, हे सुचविण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती त्यांच्या अहवाल दिल्यानंतर त्यावर राज्य शासन योग्य ती कार्यवाही सुरु करणार आहे. राज्यातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

संबंधित बातम्या :

जगात काय घडतंय? : टांझानियात बकरी आणि पॉपॉ फळ कोरोना पॉझिटिव्ह

Mumbai Corona Update : बीडीडी चाळ 8 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन, बीएमसी आणि पोलिसांचा निर्णय

Corona Updates: महाराष्ट्रात 771 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 14 हजार 541 वर

राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दाखवा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश