Maharashtra Lockdown : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याचे संकेत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार

| Updated on: May 10, 2021 | 8:04 PM

राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती मिळतेय.

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याचे संकेत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन अजून वाढवण्याचे संकेत मिळत आहे. राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती मिळतेय. राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येतील वाढ अद्याप कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे राज्यात 15 मे पर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनमधील नियमावलीत कुठलीही सूट मिळणार नाही. त्यामुळे राज्यात 30 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू शकतो असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे. (Lockdown in Maharashtra likely to be extended till May 30)

राज्यात काही जिल्ह्यामधील परिस्थिती सुधारत असली तरी काही जिल्ह्यात मात्र कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. अशावेळी राज्यातील काही जिल्ह्यात स्थानिक पाळतीवर लॉकडाऊनची नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे. त्यात रुग्णालये आणि औषधी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रत्येक जिल्ह्यात तिथल्या परिस्थितीनुसार वेगवेगळे नियम लागू करण्यात आले आहेत.

कोणत्या जिल्ह्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?

आज नाशिक, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, वाशिम, सातारा, सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या विचाराने हा निर्णय घेण्यात येत आहे.

नाशिक लॉकडाऊन –

नाशिक शहरात 12 मे म्हणजे बुधवारपासून पूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 तारखेला दुपारी 12 ते 22 तारखेच्या दुपारी 12 असे 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात रुग्णालये आणि औषधी दुकाने सोडून सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. कुणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिलीय.

अमरावती लॉकडाऊन –

अमरावती जिल्ह्यात रविवारपासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी केलीय. या काळात फक्त रुग्णालये आणि औषधी दुकाने सुरु राहणार आहेत. त्यामुळे आता कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात दारुच्या दुकानांसमोर मोठी गर्दी होत असल्यामुळे आता दारुची दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

यवतमाळ लॉकडाऊन –

यवतमाळ जिल्ह्यातही रविवारपासून 15 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक बाबी सुरु राहणार आहेत. ठरवून दिलेल्या वेळेनंतर दुकाने सुरु ठेवल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय.

कोल्हापूर लॉकडाऊन –

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी काही गंभीर बाबी दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे 2 दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. कोल्हापुरात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढतेय. तसंच तरुण मुलांचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे 10 ते 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन करावा लागेल असे संकेत मुश्रीफ यांनि दिले आहेत.

संबंधित बातम्या :

कोविड -19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी मोठा निर्णय, महिला व बालविकास विभागाची घोषणा

कोरोनाची गावखेड्यात धडक! बारामती, माळेगाव हद्दीतील गावांमध्ये हाय अलर्ट जारी

Lockdown in Maharashtra likely to be extended till May 30