उद्धव ठाकरे जबाब नोंदवणार? मानहानी खटल्यात सर्वात मोठी घडामोड, काय अपडेट?

Uddhav Thackeray Defamation Case: 17 वर्षांपूर्वीच्या मानहानी खटल्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. 2009 च्या मानहानी खटल्यात मोठी घडामोड समोर आली आहे. उद्धव ठाकरे हे कल्याण न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहणार काय? काय आहे मोठी अपडेट?

उद्धव ठाकरे जबाब नोंदवणार? मानहानी खटल्यात सर्वात मोठी घडामोड, काय अपडेट?
उद्धव ठाकरे मानहानी खटला
| Edited By: | Updated on: Jul 30, 2026 | 2:51 PM

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 17 वर्षांपूर्वीच्या मानहानी खटल्यात जबाब नोंदवला जाणार आहे.  2009 मध्ये दिवंगत वसंत डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. तत्कालीन लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखविण्यात आलेल्या कथित व्हिडिओप्रकरणी दाखल मानहानी खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 5 ऑगस्ट रोजी याप्रकरणी सुनावणी होईल. याप्रकरणी उद्धव ठाकरे यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहावे लागणार का? की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवण्यात येईल? ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवला जाणार

2009 मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखविण्यात आलेल्या कथित व्हिडिओप्रकरणी दाखल मानहानी खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात दिवंगत वसंत डावखरे यांनी कल्याण न्यायालयात खटला दाखल केला होता. 22 एप्रिल 2009 रोजीच्या प्रचारसभेत दाखविण्यात आलेल्या व्हिडिओमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा दावा डावखरे यांनी केला होता. 14 सप्टेंबर 2009 रोजी या प्रकरणाची अधिकृत नोंद झाली असून सध्या खटला कलम 313 अंतर्गत सुनावणीच्या टप्प्यावर आहे.

कलम 313 अंतर्गत आरोपींना न्यायालयासमोर उपस्थित राहून स्पष्टीकरण, जबाब नोंदवावा लागणार आहे. ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी उद्धव ठाकरे 5 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब देण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासाठी पक्षाचे विधी सल्लागार आणि नेते अनिल परब यांच्या सूचनेनुसार कल्याण न्यायालयात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय का?

व्हीआयपी व्यक्तींना न्यायालयाच्या परवानगीनंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदविण्याची मुभा असते. मोठा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा यंत्रणेवरील ताण टाळण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय निवडला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील सहआरोपी तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी अर्ज केल्याचे सांगितले जात आहे. तक्रारदार दिवंगत वसंत डावखरे यांच्या निधनानंतर त्यांचे वारसदार ही केस पुढे नेत असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. सर्व आरोपींचे जबाब नोंदवल्यानंतरच अंतिम युक्तिवाद आणि निकालाच्या दिशेने खटल्याची पुढील सुनावणी होणार असल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

2009 मधील व्हिडिओत काय?

2009 मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघात संयुक्त शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार आनंद परांजपे विरुद्ध संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे अशी मुख्य लढत झाली. परांजपे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची डोंबिवलीत प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यात ठाकरे यांनी एक व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला होता. त्यात वसंत डावखरे हे पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची तमा न बाळगता निवडणूक जिंकणार असे आवाहन करताना दिसत असल्याचा त्यांनी दावा केला होता. हा व्हिडिओ एडिट करण्यात आला आणि तो बनावट असून आपली बदनामी करण्यासाठी तो वापरल्याचा आरोप वसंत डावखरे यांनी केला होता. याविरोधात दिवंगत डावखरे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us