
तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी फिरली आहे. 10 टक्के आरक्षणावरून गुद्यांची भाषा सुरू आहे. तर मुंबई उच्च न्यायालयात मुद्यांची लढाई सुरू झाली आहे. दस्तूरखुद्द पूर्णपीठानेच आता मराठ्यांना कोणत्या आरक्षणाचा लाभ द्यायचा असा सवाल राज्य सरकारला केला. त्यामुळे राज्य सरकारसमोरील न्यायालयीन लढाई सोप्पी नसेल हे तर अधोरेखित झाले आहे. मराठ्यांना खरं तर ओबीसीतून आरक्षण हवं आहे. अर्थात कायद्याच्या परिभाषेत ज्याच्याकडे कुणबी नोंदी त्याला ओबीसी प्रमाणपत्र, असं स्पष्ट गणित मांडण्यात आलं आहे. सरकारचा सध्याचा जीआरही त्याला अनुकूल आहेत. मराठ्यांनी या लढ्यात मोठा पल्ला गाठला आहे. पण मराठ्यांना ओबीसीत घुसवण्याची घीसडघाई कायद्याच्या कचाट्यात अडकणार हे स्पष्ट आहे.
त्यातच यापूर्वी सरकारने मराठ्यांसाठी आरक्षणाचा एक खुशकीचा मार्ग काढला होता. मराठा एसईबीसी आरक्षणाची (Maratha SEBC Reservation) आता न्यायालयीन लढाईत कसोटी लागत आहे. सरकारसमोर हे आरक्षण टिकवण्याचे मोठं आव्हान तर आहेच. पण ही लढाई हातची गेली तर सरकार शब्दाला पक्के नाही असा मॅसेज जायलाही वेळ लागणार नाही. त्यामुळे मराठा एसईबीसीच्या कायदेशीर लढाईत सरकारला जपून पाऊल टाकावं लागणार आहे. सामाजिक वीण सैल न होता ओबीसी आणि मराठ्यांची एकसांगड घालणं गरजेचे आहे. आज हायकोर्टातील सुनावणीच्या निमित्ताने सरकारसमोर काही आव्हानात्मक मुद्दे समोर येत आहेत. कोणते आहेत हे मुद्दे?
मराठा समाज हा मागास हे सिद्ध करावे लागणार
आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांवर पूर्णपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली. त्यावेळी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांनी अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत.मराठा समाज मागास नाही असा युक्तीवाद केला. मराठा समाज मागास नाही हे पटवून देण्यासाठी त्यांनी वेगवेगळे दाखले दिले.
तर राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी राज्यात २८ टक्के मराठा आहेत त्यातले २५ टक्के गरीब आहेत, अशी बाजू मांडली. युक्तीवाद पाहता आता मराठा समाज हा मागास आहे. मुख्य प्रवाहात नाहीये. हे SEBC आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारला सिध्द करावे लागणार आहे.
मराठ्यांचं मागासलेपण कशात?