लोकलच्या फेऱ्या कमी होणार का, मुंबईत लॉकडाऊन होणार? पालकमंत्री अस्लम शेख म्हणतात…..

| Updated on: Feb 23, 2021 | 3:14 PM

मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल पुन्हा बंद होईल का? या विचाराने मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सूचक वक्तव्य केलं (Minister Aslam Shaikh on Mumbai Local train).

लोकलच्या फेऱ्या कमी होणार का, मुंबईत लॉकडाऊन होणार? पालकमंत्री अस्लम शेख म्हणतात.....
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: माध्यमांसमोर येऊन जनतेला नियम पाळण्याचं आवाहन केलं. याशिवाय लोकांनी नियम पाळले नाहीत, मास्क वापरला नाही तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करु, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत असल्याने मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल पुन्हा बंद होईल का? या विचाराने मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सूचक वक्तव्य केलं (Minister Aslam Shaikh on Mumbai Local train).

बैठकीत चर्चा होणार

कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने आणखी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलवण्यात आल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली. “काही दिवसांआधी मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला होता. रुग्णसांख्या कमी झाली नाही तर काय करणार यासाठी बैठक बोलावली आहे. लोकल ट्रेन संख्या कमी करावी का, बस रूट बदलावा का, खाऊ गल्ली बंद करायची का, हॉटेलची वेळ, सार्वजनिक ठिकाणी काय कारवाई करता येईल, यावर चर्चा होईल”, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.

‘लॉकडाऊन लावण्याची मजबूरी येऊ नये हा प्रयत्न’

“लोकल ट्रेन बंद होऊ नये, अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आधीच इशारा दिला आहे. आवाहन करून लोक ऐकत नसतील तर कारवाई होईल. याशिवाय कारवाई सुरू देखील करण्यात आलेली आहे. हॉटेल, नाईट क्लबवर कारवाई सुरू आहे. लॉकडाऊन बघायचं नसेल तर मुंबईकरांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. लॉकडाऊन लावण्याची मजबूरी येऊ नये हा प्रयत्न आहे”, असं अस्लम शेख यांनी सांगितलं.

‘नियम न पाळणाऱ्या मंत्र्यांवरही कारवाई’

“मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर सर्व मंत्र्यांनी कार्यक्रम रद्द केले. जर कोणी गाईडलाईन्स फॉलो नाही केल्या तर कारवाई होणार. एखाद्या कार्यक्रमाला मंत्री गेले आणि गर्दी झाली तर कारवाई करण्यात आलेली आहे”, असं शेख म्हणाले.

मुंबईत लॉकडाऊन लागेल का?

“अमरावतीमध्ये लॉकडाऊन झाला. काही जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लावला आहे. त्याच पर्श्वभूमीवर रुग्ण वाढले तर लॉकडाऊन होऊ शकतो. कोरोना संसर्गामुळे विशेष लक्ष द्यावे लागेल”, अशी प्रतिक्रिया अस्लम शेख यांनी दिली (Minister Aslam Shaikh on Mumbai Local train).

हेही वाचा : ‘चौकशीचा निष्कर्ष येईपर्यंत पदत्याग करा’, संजय राठोडांच्या स्पष्टीकरणानंतरही भाजप मागणीवर ठाम