MNS : सरकार विरोधी चित्र दिसताच मनसेने उचललं आणखी एक महत्वाचं पाऊल, मोर्चा नंतर पण त्याआधी आज संध्याकाळापासूनच..

MNS Support CJP Protest : . भाजपच्या राजकारणात बॅकफूटवर गेलेले दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा जोरदारपणे सक्रीय झाले आहेत. गमावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी दोघे पुन्हा कामाला लागले आहेत.

MNS : सरकार विरोधी चित्र दिसताच मनसेने उचललं आणखी एक महत्वाचं पाऊल, मोर्चा नंतर पण त्याआधी आज संध्याकाळापासूनच..
Sandeep Deshpande
| Updated on: Jul 23, 2026 | 2:45 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधुंनी येत्या 26 जुलैला मोर्चाची हाक दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. रविवारी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर हा मार्च निघणार आहे. ठाकरे गटाने या मोर्चात सर्व नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. भाजपच्या राजकारणात बॅकफूटवर गेलेले दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा जोरदारपणे सक्रीय झाले आहेत. गमावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी दोघे पुन्हा कामाला लागले आहेत. एक सरकारविरोधात जनमत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण भाजपच्या विस्ताराचा सर्वाधिक फटका या दोघांनाच बसला आहे.

26 जुलैला आंदोलन होईलच. पण त्याआधी मनसेने एक नवीन मोहिम सुरु केली आहे. ‘एक सही पाठिंब्याची’ असं या मोहिमेचं नाव आहे. आज संध्याकाळी शिवाजी पार्क मैदानात ही मोहिम राबवली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी या मोहिमत सहभागी व्हावं असं आवाहन मनसेने केलं आहे. “विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी पक्षातर्फे नाही तर एक नागरिक म्हणून या मोहिमेचं आयोजन केलं आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे समर्थक असाल किंवा विरोधी पक्षाचे हा विषय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. कुठलही राजकारण यात नाही” असं संदीप देशपांडे म्हणाले.

ते दिल्लीत सीजेपीच्या स्टेजवर गेले

दोन्ही ठाकरे बंधु आता सीजेपीने सुरु केलेल्या या आंदोलनात सक्रीय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मागच्या रविवारी दादर शिवाजी पार्कमध्ये अभिजीत दीपकेला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर ते दिल्लीत सीजेपीच्या स्टेजवर गेले. अभिजीत दीपके आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आता रविवारी भव्य मोर्चा काढणार आहे. एकूणच दोन्ही ठाकरे बंधुंचा सरकार विरोधी वातावरण निर्मितीचा प्रयत्न दिसत आहे. ‘एक सही पाठिंब्याची’ ही मोहिम सुद्धा त्याच रणनितीचा एक भाग आहे.

 

Follow Us