2010 ला मेट्रोला विरोध करणारे बच्चन सरकार बदलल्यावर बदलले का? : मनसे

| Updated on: Sep 18, 2019 | 12:48 PM

2010 ला मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन सरकार बदलल्यानंतर कसे बदलले असा सवाल मनसेचे अखिल चित्रे यांनी केला आहे.

2010 ला मेट्रोला विरोध करणारे बच्चन सरकार बदलल्यावर बदलले का? : मनसे
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मुंबई मेट्रोचं (Mumbai Metro) कौतुक करत आरेच्या जंगलतोडीला (Aarey Deforestation) अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. त्यानंतर मनसेने (MNS) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. जंगल तोडून घरात झाड लावल्यानं जंगल तयार होत नाही, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) उपाध्यक्ष अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी व्यक्त केले. 2010 ला मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन सरकार बदलल्यानंतर कसे बदलले असाही सवाल चित्रे यांनी यावेळी केला.

अखिल चित्रे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “2010 ला मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन नवं सरकार आल्यावर मेट्रोला पाठिंबा देत आहेत. सरकार बदलल्यावर अमिताभ बच्चन यांची भूमिका देखील बदलली आहे का? अमिताभ बच्चन यांना कदाचित हा विषय संपूर्ण माहिती नसावा. त्यांच्या पी. आर. टीमने हे ट्विट केलं असावं.”

“जंगल तोडून घरात झाड लावल्याने जंगल तयार होत नाही”


अखिल चित्रे यांनी अमिताभ बच्चन यांच्या मेट्रो समर्थानाच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली, “तुम्ही देखील आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत तुमच्या विदेशातून मागवलेल्या गाड्यांमधून प्रवास करण्याऐवजी लवकरच मेट्रोतून प्रवास कराल, अशी आम्हाला आशा आहे. घराच्या परिसरात झाड लावणं हा निसर्गातील जंगलांना पर्याय होऊ शकत नाही. वास्तव कल्पनेपेक्षा विचित्र असते.”

अमिताभ बच्चन  काय म्हणाले होते?

अमिताभ बच्चन आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते, “माझ्या एका मित्राला तात्काळ दवाखान्यात जायचं होतं. त्याने कारऐवजी मेट्रोनं जाणं पसंद केलं. तो उपचार घेऊन घरी परतला तेव्हा तो खूप प्रभावित झाला होता. त्यानं मेट्रो खूप जलद, सोयीस्कर आणि उपयुक्त असल्याचं म्हटलं.”

‘अप्रत्यक्षरित्या मेट्रोच्या कामासाठी आरेतील जंगलतोडीलाच पाठिंबा’

बच्चन आपल्या ट्विटमध्ये मेट्रोची उपयुक्तता सांगून तेवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी मेट्रोचा, प्रदुषणाचा आणि झाडांचाही संबंध जोडला. ते म्हणाले, “प्रदूषणावर उपाय म्हणजे अधिक झाडं लावा. मी आमच्या घराच्या बागेत झाडं लावली आहेत, तुम्ही लावलीत का?” यातून बच्चन यांनी अप्रत्यक्षरित्या मेट्रोच्या कामासाठी आरेतील जंगलतोडीलाच पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे.

विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या या भूमिकेनंतर मुंबई मेट्रो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चन यांच ट्विट रिट्विट करत कौतुक केलं आहे. त्यामुळे आरेच्या जंगलतोडीवरुन वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आधीच मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जंगलतोडीला विरोध केला आहे. निसर्गानं पदरात टाकलेलं हरितदान उध्वस्त करणारा विकास हवा की रचनात्मक दूरदृष्टीने घडवलेला शाश्वत विकास? असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरेंनी देखील पत्रकार परिषद घेऊन आरेतील जैवविविधतेचा लेखाजोखा मांडला. तसेच मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जंगलतोडीला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं.

नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेर यांनी देखील आरे आणि मुंबई मेट्रोवर बोलताना नाणारचं जे झालं तेच आरेतील मुंबई मेट्रोचं होईल, असं सुचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.