खरंच ‘हिंदू खतरे में है’ तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा; संजय राऊत यांचं आव्हान

| Updated on: Nov 14, 2021 | 1:32 PM

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत तर त्याचे पडसाद फक्त महाराष्ट्रात का उमटत आहेत? बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकात पडसाद का उमटत नाहीत? यामागे काय षडयंत्रं आहे.

खरंच हिंदू खतरे में है तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा; संजय राऊत यांचं आव्हान
sanjay raut
Follow us on

मुंबई: बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत तर त्याचे पडसाद फक्त महाराष्ट्रात का उमटत आहेत? बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकात पडसाद का उमटत नाहीत? यामागे काय षडयंत्रं आहे, असा सवाल करतानाच जर खरोखरच हिंदू असुरक्षित आहे असं वाटत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत मोर्चा काढावा. मोदी-शहांना जाब विचारावा. आम्ही तुमच्या सोबत येऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना मोहन भागवतांना हे आव्हान दिलं. काश्मीरमधील पंडितांच्या होत आहेत. जवानांच्या हत्या सुरू आहेत. त्या बांगालदेशातील घटनांपेक्षा भयंकर आहेत. त्यासाठी समस्त राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र यावं आणि दिल्लीत मोठा मोर्चा काढावा. हिंदू खरोखरच खतरे में है असं वाटत असेल तर सरसंघचालक मोहन भागवतांनी या मोर्चाचं नेतृत्व करावं, करणार आहात का नेतृत्व? हिंदूंबाबत आपल्या देशात काय चाललं आहे याचा जाब त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विचारावा, असं राऊत म्हणाले.

कशाकरिता हा खेळ सुरू आहे?

त्रिपुरात मोर्चा काढतात. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात. महाराष्ट्रात हिंसाचार होतो आणि रझा अकादमी म्हणते त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. मग हे कोण करत आहे? त्याचे उत्तर मिळायला हवं. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांचं अभिनंदन करतो. त्यांचं म्हणणं आहे की, त्रिपुरात काही घडलंच नाही. त्रिपुरात काही घडलंच नाही तरी मोर्चे निघत आहेत. त्रिपुरात काहीच घडलं नाही हे जर सत्य असेल तर मोर्चा आणि आंदोलनाचे आम्ही जे फोटो पाहतोय ते काय आहे? कशा करीता हा सर्व खेळ सुरू आहे? महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा आणि देशात तणाव निर्माण करण्याचा हा डाव आहे काय? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच त्रिपुरात भाजपला तृणमूल काँग्रेसचं आव्हान उभं राहत आहे. त्यामुळे तर हे षडयंत्रं रचलं जात नाही ना? असा सवालही त्यांनी केला.

फक्त महाराष्ट्रातच का? इतर राज्यात का नाही?

रझा अकादमी काय म्हणते मला माहीत नाही. पण महाराष्ट्रात हिंसाचार किंवा दंगली घडवण्या इतकी ताकद किंवा समर्थन रझा अकादमीकडे कधीच नव्हतं. काही वेळेला रझा अकादमीने लोकांची डोकी भडकवली आहे. पण त्यांच्यावर सरकारने पूर्ण नियंत्रण आणलं आहे. खरंतर त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद का उमटावे? त्रिपुरात असं काय घडलं की त्यामुळे महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटावी? बांगलादेशमध्ये मंदिरामध्ये हल्ले झाले म्हणून त्रिपुरात मोर्चे निघाले. त्यात मशिदींवर दगडफेक झाली. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचं सांगतात. मग महाराष्ट्रातच का? उत्तर प्रदेशात का नाही? दिल्लीत का नाही? बिहारमध्ये का नाही? कर्नाटकात का नाही? फक्त महाराष्ट्रात का हा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं काही तरी कारस्थान आहे असं वाटतं, असा आरोप त्यांनी केला.

मणिपूरची घटना सर्वात धक्कादायक

बांगलादेशातील मंदिरावरील हल्ले ही चिंतेची गोष्ट आहे. मग कश्मीरमध्ये हिंदूंचं शिरकाण होतंय, त्याविरोधात का मोर्चे काढले जात नाही? त्रिपुरा सोडा, इतरत्रं का काढत नाहीत मोर्चे? काल मणिपूरमध्ये एक कर्नल आणि एक कुटुंब मारलं गेलं ही त्यापेक्षा धक्कादायक गोष्ट आहे. त्यावर दिल्लीत मोर्चा काढला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

Milind Teltumbde | ज्याच्या डोक्यावर 1 कोटी 20 लाखाचं इनाम, तो देशातला सर्वात मोठा नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे ठार!

दरोड्याच्या तयारीत असलेल्या 6 जणांच्या टोळीला भोसरी पोलिसांनी इंगा दाखवला, तिथल्या तिथं नांग्या ठेचल्या!

PMAY-G: घर बांधण्यासाठीच्या कर्जावर सरकारकडून अनुदान; जाणून घ्या योजनेचा फायदा?