राजू वाघमारे यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते होते. माध्यमांमध्ये आणि जनतेसमोर काँग्रेस पक्षाची बाजू राजू वाघमारे यांनी मांडली. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजू वाघमारे यांनी शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश झाल्यानंतर शिवसेनेने राजू वाघमारे यांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू वाघमारे यांच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया दिली. शिंदेंनी वाघमारे यांचं शिवसेनेत स्वागत केलं. तसंच वाघमारे शिवसेनेत का आले? यावरही शिंदेंनी भाष्य केलं.
काँग्रेसमध्ये नाना पटोले सोडून कुणीही बोलायला उरलेलं आहे की नाही, हेच कळत नाही. काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे येत्या काळात काय होतंय ते तुम्हाला दिसेल. काँग्रेसमध्ये असताना हिंदुत्व नव्हतं, असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे राजूजी शिवसेनेत आलेत. राजू वाघमारे हे शिवसेनेत उपनेते म्हणून काम करतील. तसंच सहप्रवक्ते म्हणूनही ते काम करतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
महायुतीत डोकावण्यापेक्षा महाविकास आघाडीनं आपल्याकडे काय होतंय ते पाहावं. श्रीकांत शिंदेचा प्रचार सुरु आहे. बाकीच्या लोकांची देखील उमेदवारी लवकरच जाहीर होईल. महायुतीत असं नाही दोन-दोन तीन-तीन लोकं महाविकास आघाडीतील लोकं उभे राहात आहेत. मात्र आमच्याकडे असं नाही आहे. 2024 ला सर्व एकत्र आलेत. मात्र कधी एक एक पळाले हे माहितीच पडलं नाही. नरेंद्र मोदी येत्या निवडणुकीत रेकॉर्ड मोडतील आणि 400 पारचा नारा पूर्ण होईल, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
अवकाळी पाऊस, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, चाऱ्याच्या प्रश्नासंदर्भात बोललो आहे. मुख्य सचिव, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कामं होतील. त्यांना तशा सूचना दिल्या आहेत. कुठे काही कमी पडणार नाही याची काळजी घेऊ. नुकसान भरपाई देण्याचे काम आम्ही करु. पंचनामे करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. निवडणुका होत राहतील. पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केलं.