Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?
Mumbai Congress Protest: दिल्लीत क्रॉकोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. परवा विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. तर काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईत काँग्रेसने मोठे आंदोलन केले.

Mumbai Congress Protest : दिल्लीत क्रॉकोच जनता पार्टीचे आंदोलन तापले आहे. सोमवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याप्रकरणी विरोधकांनी देशभर रान उठवले आहे. जंतर मंतरवर विविध पक्षांच्या नेत्यांनी कालपासून एकच गर्दी सुरू केली आहे. अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळाला भेट देत पाठिंबा जाहीर केला आहे. तर या आंदोलनाचा वणवा देशभरात पोहचला आहे. ठिकठिकाणी काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन करत आहे. मुंबईतही काँग्रेसने भर पावसात आंदोलन केले. भाजपच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसने आंदोलनाचा नारा दिला. काँग्रेस मोर्चाने मुंबई भाजप कार्यालयाकडे कूच केली असतानाच पोलिसांनी धरपकड सुरू केली.
काँग्रेस नेत्याचा रस्त्यावरच ठिय्या
गांधी भवनाबाहेर काँग्रेस नेत्यांनी भाजपविरोधात आंदोलन केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नेते विजय वडेट्टीवार, हुसेन दलवाई, अस्लम शेख, भाई जगताप यांच्यासह अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेसने भाजपविरोधात यावेळी घोषणाबाजी केली. पावसात आंदोलन केले. भाजप कार्यालयाकडे मार्च काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. पण पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी नेत्यांनी रस्त्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी या नेत्यांना उचलले.
काल विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान निवासस्थानसमोर आंदोलन केले. दीड तासाहून अधिक काळ हे आंदोलन सुरू होते. केंद्रीय मंत्र्यांनी यशस्वी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. अखेर संध्याकाळी राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि नंतर सोडण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ आज मुंबई काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. यावेळी पक्षातील मोठे नेते उपस्थित होते. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर कालच्या घटनेचा निषेध केला. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलीस आम्हाला का ताब्यात घेत आहे, हे कळत नसल्याची प्रतिक्रिया सपकाळ यांनी यावेळी दिली.
चेंबुरमध्ये सुद्धा मोठे आंदोलन
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ चेंबूरच्या डायमंड गार्डन परिसरात हजारोच्या संख्येनं विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे. काँक्रोच जनता पार्टी (CJP) कडून सुरू करण्यात आलेल्या संसद मोर्च्याची देशभरात जोरदार चर्चा आहे. गावागावांत, शहरांमध्ये तसेच सोशल मीडियावर या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जंतर-मंतर येथे झालेल्या हिंसक घटनांनंतर आंदोलनाला आणखी धार आली आहे. निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असे वक्तव्य अभिनेत्री स्वरा भास्कर हीचा पती फहाद अहमद यांनी केले आहे.