
महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. येत्या डिसेंबर महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने मतदारयादी प्रमुखांचा एक भव्य मेळावा पार पडत आहे. मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या ग्रँड मेळाव्यासाठी मनसेकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्याला मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी, मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख आणि उपशाखाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
मनसेकडून आयोजित मतदारयादी प्रमुखांच्या भव्य मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि मतदानाची प्रक्रिया बारकाईने हाताळण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज करणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. मनसे या मेळाव्यातून आपल्या आगामी राजकीय वाटचालीची आणि निवडणुकीच्या तयारीची दिशा स्पष्ट करणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील त्रुटी आणि मतदान प्रक्रियेतील अनियमितता यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची शक्यता आहे. तसेच दुबार नावे, यादीतील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींबाबत मनसैनिकांनी कसे सतर्क राहावे याबद्दलही राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे येथून नेस्को ग्राऊंडपर्यंत मनसेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी अलीकडेच विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींसोबत निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार यादीतील गोंधळ आणि निवडणूक यंत्रणेतील त्रुटींवर आक्षेप नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी दिशा आणि स्पष्ट सूचना देण्यासाठी आजचा हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे हे देखील या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. यावेळी ते देखील त्यांना मार्गदर्शन करतील.
या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या मेळाव्यातून ते आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देतील, तसेच मुंबईतील मराठी मतांना आकर्षित करण्यासाठी कोणती नवी घोषणा किंवा दिशा देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.