दहीहंडीसाठी वाट्टेल ते! एकाचा मृत्यू, दुसऱ्याची मृत्यूशी झुंज, 20 वर्षीय प्रथमेश सावंत याची काळीज हेलावणारी गोष्ट

| Updated on: Aug 24, 2022 | 9:37 AM

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळावा, यावरुन दहीहंडी होण्याआधी आणि दहीहंडी झाल्यानंतर राजकारण होत राहतं. दहीहंडीला नियम घातले पाहिजे, यावरुन चर्चा, वादविवाद होत राहतात. पण दहीहंडीला टिकवून ठेवणारीही हीच मुलं आहेत, ज्यांच्यामुळे दहीहंडी इतकी वर्ष मुंबईचं, महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखली जातेय, हे विसरुनआणि नाकारुन कसं चालेल?

दहीहंडीसाठी वाट्टेल ते! एकाचा मृत्यू, दुसऱ्याची मृत्यूशी झुंज, 20 वर्षीय प्रथमेश सावंत याची काळीज हेलावणारी गोष्ट
मुंबईच्या दहीहंडी आयोजनादरम्यानचा एक प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : मुंबई, ठाण्यात दहीहंडीला (Dahi Handi) ग्लॅमर मिळवून देणारे राजकारणी असतीलही, पण दहीहंडी टिकवून ठेवणारे गोविंदाच आहेत हे नाकारुन चालणार नाही. हेच अधोरेखित करणाऱ्या घटना दरवर्षी दहीहंडी होऊन गेल्यावर समोर येत राहतात. दहीहंडीनंतर जखमी किती झाले आणि किती जणांचा मृत्यू झाला, याची एक बातमी होते आणि चार दिवसात दहीहंडीचा विषय संपून जातो. पण दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या एका जरी गोविंदाशी जाऊन बोलाल, तर लक्षात येईल, की ‘दहीहंडीसाठी वाट्टेल ते’ करण्याची ताकद, इच्छा, उर्जा, त्यांच्यात काही महिने आधीपासून संचारलेली असते. त्याचा सरावही एक दिवस नाही, तर महिने दोन महिने आधीपासूनच सुरु होतो. प्रथमेश सावंतही (Prathmesh Sawant) अशाच गोविंदांपैकी एक आहे. गंभीर जखमी झालेल्या 24 वर्षीय संदेश दळवीची मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. आता आणखी एक गोविंदा झुंजतोय. मृत्यूशी लढतोय. केईएममध्ये (KEM) प्रथमेश सावंत या 20 वर्षीय गोविंदावर उपचार सुरु आहेत. त्याची काळीज हेलावणारी गोष्ट समोर आली आहे. एखादी जादूच आता त्याला पुन्हा नवं आयुष्य देऊ शकते, अशी अवस्था आहे. टाईम्स ऑफ इंडियाने, जखमी गोविंदा प्रथमेश सावंत बाबत सविस्तर वृत्त दिलं असून त्याच्या आयुष्यातील चढउतारही टिपलेत.

आईवडील गमावलेला प्रथमेश

20 वर्षीय प्रथमेशला आईवडील नाही. तो लहान असतानात त्याची आई कॅन्सरने गेली. ऐन उमेदीच्या काळात वडिलांचा मृत्यू झाला. एक बहीण आहे जी काकीसोबत राहते. प्रथमेशचा दिवस पेपर टाकण्यापासून सुरु व्हायचा आणि रात्री पिझ्झा डिलिव्हरी करेपर्यंत संपायचा. मधल्या वेळेत तो आयटीआयसारखा कोर्स करत होता. दहीहंडीच्या दिवशी थरात असलेला प्रथमेश कोसळला. त्याच्या शरीराला जबर बार बसला. आईवडील गमावल्यानंतरही खंबीरपणे आणि ताठ मानेने जगण्यासाठी धडपडणाऱ्या प्रथमेशचा पाठीचा कणा मोडला. तो आता बेडवर आहे. त्याच्या हाताच्या बोटांना कोणतीच हालचाल नाही. त्याला कोणताच स्पर्श जाणवत नाही.

हे सुद्धा वाचा

अधूनमधून त्याचे मित्र त्याला पाहून जातात. काकीकडे प्रथमेशची चौकशी करतात. पण त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यापलिकडे आता काही काही करण्यासारखं त्यांच्याही हातात राहिलेलं नाही. आयसीयूतील डॉक्टरांनी प्रथमेशची स्थिती चिंताजनक असल्याचं सांगितलंय. त्याला मसल्स पॅरालिसिस झाला असून त्याला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलंय. त्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

दुसरा थर, पण संपूर्ण भार

प्रथमेश दुसऱ्या थरावरच होता. पण वरच्या थरावरील सगळा जोर त्याच्या शरीरावर पडला आणि त्यात त्याच्या पाठीच्या कण्याला जबर फटका बसला. दुसऱ्या थरावर असल्यामुळे हेल्मेट घातलेलं असण्याचा काही प्रश्नच नव्हता. समर क्रीडा मंडळात दुसऱ्या थरात असलेला प्रथमेश सावंत हा महिनोंमहिने दहीहंडीच्या सरावाला येत होता. घाटकोपर तेव्हा थर लावण्यासाठीचा तिसराच अटेम्प मंडळाकडून सुरु होता. कुणीही फारसं थकलेलं नव्हतं. पण प्रथमेश पडला आणि त्याची झालेली स्थिती पाहून दहीहंडीचा तो दिवस त्या पथकातील सगळ्यांच्या उत्साहावर पाणी फेरणारा ठरला.

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळावा, यावरुन दहीहंडी होण्याआधी आणि दहीहंडी झाल्यानंतर राजकारण होत राहतं. दहीहंडीला नियम घातले पाहिजे, यावरुन चर्चा, वादविवाद होत राहतात. पण दहीहंडीला टिकवून ठेवणारीही हीच मुलं आहेत, ज्यांच्यामुळे दहीहंडी इतकी वर्ष मुंबईचं, महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखली जातेय, हे विसरुनआणि नाकारुन कसं चालेल?

जखमी गोविंदावर सरकारी रुग्णालयात मोफत उपचार करण्याचे आदेश तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. पण तितकेच पुरेसे आहेत का, हाही प्रश्न लाखो रुपयांची बक्षिसं लावून दहीहंडीचं आयोजन करणाऱ्यांनी एकदा विचारायला हवं. मोठ्या आयोजकांनी प्रथमेशला पैशांची मदत केली नाही, तरी चालेल, पण त्याची एकदा किमान भेट तरी घेऊन यायला हवी. आताच्या घडीला हे कुणी करेल का? माहीत नाही.

जखमी गोविंदांची ही अवस्था पाहून आता प्रथमेशच्या डॉक्टरांनाही दहीहंडीवर नियम आणावे, उंचीवर मर्यादा घातली जावी, थर लावणाऱ्यांना सुरक्षेचे घालून दिलेले निकष अधिक कडक करावेत, असं वाटतंय. ह्यावर चर्चा सुरु राहतील. पण प्रथमेश सावंतच्या हाताची हालचाल पुन्हा सुरु झालेली असेल का? तो बेडवर किमान बसावा, अशी आशा त्याच्या काकीला वाटतेय. ती पूर्ण होईल का? सहा तासांनंतर अत्यंत कठीण प्रयत्नांनी तो खाऊ शकतोय. पुढच्या काही दिवसात जर त्याच्या शरीराने प्रतिसाद दिला, तर आणि तरच त्याची प्रकृती सुधारु शकते, असं डॉक्टरांचं म्हणणंय. पण तोपर्यंत आईवडीलही नसलेल्या प्रथमेशला धीर द्यायला कुणी येईल का? हा प्रश्न जास्त अस्वस्थ करणारा आहे.