मी शेतकरी कुटुंबातला सामान्य मुलगा, एवढं कौतुक झेपत नाहीये; कौतुकाचा वर्षाव होत असताना लेशपाल जवळगेचं वक्तव्य चर्चेत

Leshpal Jawalge And Harshad Patil : ठिकठिकाणी सत्कार अन् जितेंद्र आव्हाड यांच्याकडून आर्थिक मदत; लेशपाल जवळगे म्हणतो, एवढं कौतुक झेपत नाहीये...

मी शेतकरी कुटुंबातला सामान्य मुलगा, एवढं कौतुक झेपत नाहीये; कौतुकाचा वर्षाव होत असताना लेशपाल जवळगेचं वक्तव्य चर्चेत
| Updated on: Jun 30, 2023 | 9:33 AM

मुंबई : मी शेतकरी कुटुंबातला आहे. ग्रामीण भागातून आलोय. एवढ्या कौतुकाची मला सवय नाहीये. पण आता मागच्या दोन तीन दिवसांपासून एवढं कौतुक होतंय की ते मला झेपतच नाहीये, असं म्हणत लेशपाल जवळगे याने होणाऱ्या कौतुक सोहळ्यावर भाष्य केलं. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या तरूणांच्या डोळ्यात स्वप्न असतात. पण घरून पैसे घ्यायला. कसं तरी वाटतं. पण या मिळालेल्या पैशातून आर्थिक मदत होईल, असं लेशपाल म्हणाला.

हर्षदनेही आपला अनुभव सांगितला. ती घटना घडली तेव्हा कौतुक वगैरे हे काहीही डोक्यात नव्हतं. फक्त ती मुलगी वाचली पाहिजे एवढंच वाटत होतं,असं हर्षद म्हणाला.

पुण्यात भरदिवसा एका तरूणीवर कोयत्याने हल्ला झाला. या हल्ल्यातून ती तरूणी थोडक्यात वाचली. दोन तरूणांच्या सतर्कतेमुळे ही तरूणी थोडक्यात वाचली. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांनी आपला जीव धोक्यात घालत तरूणीला वाचवलं. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांवर कौतुकाचा वर्षाव होतोय. जितेंद्र आव्हाड यांनी तर दोघांना प्रत्येकी 51 हजारांचं बक्षीस जाहीर केलं.

जितेंद्र आव्हाड यांनी या दोघांना बोलावत त्यांना सत्कार केला. याची माहिती आव्हाडांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

पुण्यात माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात,एका तरुणीचा जीव वाचणाऱ्या तीन जिगरबाज योद्ध्यांना आज भेटलो.लेशपाल जवळगे,हर्षद पाटील,दिनेश मडावी या तीन तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावत एका तरुणीचा जीव वाचवला.इतकंच नव्हे तर हल्ला करणाऱ्या तरुणाचा जीव देखील या युवकांनी वाचवला आहे.

या तिघांसोबत गप्पा मारत असताना एक गोष्ट मात्र जाणवली आणि सुखद धक्का बसला.छत्रपती शिवाजी महाराज,शाहू,फुले आणि आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारी ही मुलं आहेत.सदर घटना घडल्यानंतर ते अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले.अनेकांनी त्यांची काळजी पोटी चौकशी केली.परंतु अनेकांनी त्या हल्लेखोरांची जात विचारून त्यांना हैराण केले.मुलीची जात विचारून तिची ओळख नेमकी काय आहे,हे विचारण्या पर्यंत काही लोकांची मजल गेली.

या प्रकाराने ही मुलं दुःखी दिसली.याबद्दल बोलताना त्यांचा सामूहिक सुर असा दिसला की,”आम्ही जात बघून त्या मुलीला वाचवलं नाही.आमच्या समोर एका मुलीचा जीव जातोय आणि अश्या वेळी आम्ही षंढासारखे गप्प बसू शकत नव्हतो.आपल्या बहिणीची रक्षा केली पाहिजे,या विचाराने आम्ही तिचा जीव वाचवला…!”

विचारांनी प्रगल्भ आणि शाहू,फुले,आंबेडकरांचा विचार समर्थपणे पुढे घेऊन जाणारे हे वाघ आहेत.अशी तरुण मंडळी या समाजात मोठ्या संख्येने निर्माण झाली तर आपल्या राज्याचं भविष्य नक्कीच उज्वल असेल,यात शंका नाही.

मी शब्द दिला होता त्याप्रमाणे,तिघांना पारितोषिक दिलं आहे.या तिन्ही मुलांनी एक प्रेमळ आणि हक्काची मागणी केली की,त्यांना पवार साहेबांना भेटायचं आहे..! आणि लवकरच मी त्यांची ही मागणी देखील पूर्ण करणार आहे.