मुंबईत गॅस टंचाईचे मोठे संकट, पुढच्या 48 तासात…; हॉटेल मालकांचे धाबे दणाणले

मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल उद्योग संकटात सापडला आहे. गॅस पुरवठा १०-२० टक्क्यांनी घटल्याने पुढील ४८ तासांत रेस्टॉरंट्स बंद होण्याची भीती 'आहार' संघटनेने व्यक्त केली आहे.

मुंबईत गॅस टंचाईचे मोठे संकट, पुढच्या 48 तासात...; हॉटेल मालकांचे धाबे दणाणले
Mumbai LPG
| Updated on: Mar 10, 2026 | 9:16 AM

मुंबईत सध्या एलपीजी (LPG) सिलेंडरच्या तीव्र टंचाईचे ग्रहण लागले आहे. सध्या व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अचानक कपात झाली आहे. या कपातीमुळे मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती तातडीने न सुधारल्यास पुढील ४८ तासांत शहरातील अनेक उपाहारगृहे बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईतील प्रमुख हॉटेल संघटनांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात १० ते २० टक्क्यांची मोठी घट झाली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून (OMCs) मिळणारा पुरवठा विस्कळीत झाला आहे. वितरकांकडे सिलेंडरची मागणी करूनही वेळेवर डिलिव्हरी मिळत नाही. यामुळे दररोज हजारो ग्राहकांना सेवा देणाऱ्या हॉटेल्सचे किचन चालवणे कठीण झाले आहे.

या संकटामागे प्रामुख्याने जागतिक आणि स्थानिक अशी दोन्ही कारणे आहेत. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आयातीचा मार्ग विस्कळीत झाला आहे. भारताची मोठी एलपीजी आयात याच मार्गाने होते, जिथे सध्या मालवाहू जहाजांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. तर दुसरीकडे घरगुती सिलेंडरच्या वाढत्या मागणीमुळे तेल कंपन्यांनी व्यावसायिक पुरवठ्यापेक्षा घरगुती पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे. ज्याचा फटका थेट उद्योगांना बसत आहे. तसेच लॉजिस्टिक्स आणि रिफायनरी स्तरावरील तांत्रिक कामांमुळे मुंबईतील डेपोंमधून सिलेंडर बाहेर पडण्यास विलंब होत आहे.

आहार (AHAR) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईसह आजूबाजूच्या शहरात व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा केवळ उपलब्धतेपुरता मर्यादित आहे. यामुळे काळाबाजार वाढण्याची आणि किंमती वाढण्याची भीती आहे. अनेक लहान हॉटेल मालकांकडे बॅकअप साठा नसतो, त्यामुळे त्यांना दररोजच्या डिलिव्हरीवर अवलंबून राहावे लागते. जर पुरवठा असाच विस्कळीत राहिला तर कर्मचाऱ्यांचे पगार आणि वीज बिले भरणेही अशक्य होईल, असे आहार संघटनेने म्हटले.

सध्या गॅसची कमतरता वाढत चालली आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईतील सर्व रेस्टॉरंट्स पुढील दोन दिवसांत बंद करावे लागू शकतात. सध्या असोसिएशनच्या सुमारे १० ते २० टक्के सदस्यांना गॅस पुरवठ्याची समस्या येत आहे, असेही आहार संघटनेने सांगितले आहे.

पर्यायी उपाय काय?

अनेक ठिकाणी जास्त वेळ शिजवावे लागणारे पारंपरिक पदार्थ तात्पुरते बंद केले जात आहेत. काही रेस्टॉरंट्स दुपारी ३ ते ७ या वेळेत आपले किचन पूर्णपणे बंद ठेवून गॅसची बचत करत आहेत. तसेच जिथे शक्य आहे तिथे इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक ओव्हनचा वापर वाढवला जात आहे, मात्र यामुळे वीज बिल वाढण्याची धास्ती आहे.

Follow Us