
मुंबई महानगरपालिकेच्या ७८ व्या महापौरपदासाठी भाजपने अनुभवी नगरसेविका रितु राजेश तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली असून, ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत रितु तावडे महायुतीच्या अधिकृत उमेदवार असतील. मुंबईचे महापौरपद ‘सर्वसाधारण प्रवर्ग – महिला’ या गटासाठी आरक्षित झाल्याने भाजपने रितू तावडे यांच्या रूपाने एका अनुभवी आणि आक्रमक चेहऱ्याला संधी दिली आहे.
रितु तावडे यांची ओळख केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, तर जनसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणाऱ्या नेत्या म्हणून आहे.
१. जागतिक स्तरावर दखल (BBC लंडन): महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या विबत्स जाहिराती आणि पुतळ्यांविरोधात त्यांनी पुकारलेल्या लढ्याची दखल खुद्द ‘बीबीसी लंडन’ने घेतली होती. त्यांच्या आंदोलनामुळे अशा जाहिरातींवर बंदी घालण्यात आली.
२. महिला सुरक्षा: पालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी करत प्रशासनाला धारेवर धरले होते.
३. पाणी माफियांविरुद्ध लढा: घाटकोपरमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी त्यांनी काढलेला ‘हंडा मोर्चा’ अत्यंत गाजला, ज्यानंतर प्रशासनाने पाणी चोरांवर कडक कारवाई केली.
४. सक्षमीकरण: त्या ‘मराठा प्रतिष्ठा’ संस्थेच्या अध्यक्षा असून, ‘महिला आर्थिक विकास महामंडळाच्या’ (MAVIM) माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या आहेत.
कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी
१८ एप्रिल १९७३ रोजी जन्मलेल्या रितु तावडे यांचे शिक्षण एस.वाय.बी.कॉम पर्यंत झाले आहे. त्यांचे पती राजेश तावडे हे उद्योजक आहेत. रितु तावडे स्वतः व्यवसायातही सक्रिय असून त्या मे. आर. आर. इंटरप्राईजेसच्या प्रोप्रायटर आहेत.
मुंबईत ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. रितु तावडे या मराठा समाजातील असल्या तरी, त्या गुजराती बहुल प्रभागातून मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. त्यामुळे मराठी आणि गुजराती अशा दोन्ही मतदारांना सांधणारा चेहरा म्हणून भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. महायुतीकडे बहुमत असल्याने रितु तावडे या मुंबईच्या पुढच्या ‘प्रथम नागरिक’ होणे आता निश्चित मानले जात आहे.