मनसेच्या मोर्चाला मुंबई पोलिसांचा नकार, पण मोर्चा काढण्यावर कार्यकर्ते ठाम

| Updated on: Nov 25, 2020 | 6:35 PM

मनसेच्या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, मुंबई पोलिसांच्या नकारानंतरही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम आहे (Mumbai Police refused permission for MNS protest).

मनसेच्या मोर्चाला मुंबई पोलिसांचा नकार, पण मोर्चा काढण्यावर कार्यकर्ते ठाम
Follow us on

मनसे : वाढीव वीज बिलविरोधात मनसे उद्या (गुरुवार, 26 नोव्हेंबर) संपूर्ण राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. यापैकी सर्वात मोठा मोर्चा हा मुंबईत नियोजित करण्यात आला आहे. मात्र, या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर मुंबई पोलिसांच्या नकारानंतरही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम आहे (Mumbai Police refused permission for MNS protest).

मुंबईत म्हाडा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार होता. या मोर्चासाठी मनसेने परवानगी मागतली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे. त्यामुळे सुरक्षेचं कारण सांगत पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारली आहे. पण पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून निवेदन देण्यास परवानगी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सैनिक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला आहे. राजयोग हॉटेल ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चा निघणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे (Mumbai Police refused permission for MNS protest).

‘मोर्चा शांतपणे निघेल’

वीज बिलविरोधात निघणारा मोर्चा अतिशय शांतपणे निघेल, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितल आहे. मोर्चाबाबत राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मोर्चेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन व्हावं, अशी सूचना देण्यात आली आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

वाढीव वीज बिलविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याआधी 19 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन मनसेची अधिकृत भूमिका स्पष्ट केली होती.

“राज्यातील जनतेला वाढीव बिलाचा शॉक बसल्यानंतर मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांना भेटले, त्याशिवाय ऊर्जा सचिव, बीएमसी अधिकाऱ्यांना भेटले. अदाणी ग्रुपचे अधिकारी राज ठाकरेंना भेटले. राज ठाकरे स्वत: राज्यपालांना भेटले. राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना भेटण्यास सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे हे शरद पवारांशी बोलले. पवारांनी राज ठाकरेंकडून निवेदनं मागवली. आम्ही ही निवेदनं दिली. तरीही त्यावर निर्णय घेतला गेला नाही. आता तर वीजबिल माफ करणार नसल्याचं ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला विश्वास आहे, पवारसाहेबांचा… कारण राज ठाकरे बोलल्यानंतर पवारसाहेब म्हणाले होते, राज्य सरकारशी बोलतो. पण मला वाटतं पवारसाहेबांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली नाही”, असं नांदगावकर म्हणाले होते.

संबंधित बातमी : राज ठाकरेंच्या वीजबिल माफीच्या आंदोलनात भाजपही; बावनकुळेंचं मोठं विधान