मुंबईकरांसाठी खूशखबर, मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हरफ्लो

| Updated on: Aug 01, 2019 | 9:47 AM

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी, तानसा, मोडक सागर या तलावानंतर आता आणखी एक तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. बोरिवलीच्या नॅशनल पार्कच्या हद्द असलेला विहार तलाव (Vihar lake) भरला आहे.

मुंबईकरांसाठी खूशखबर, मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हरफ्लो
Follow us on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी, तानसा, मोडक सागर या तलावानंतर आता आणखी एक तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. बोरिवली नॅशनल पार्कच्या हद्दीत असलेला विहार तलाव (Vihar lake) भरला आहे. यामुळे मुंबईकरांवरचे पाणी संकट टळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी एक विहार तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. याआधी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तुळशी, तानसा आणि मोडकसागर हे तीन तलाव आधीच भरले होते. त्यानंतर आता विहार तलावही भरुन वाहू लागला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी विहार तलाव भरुन वाहू लागला.

यंदा सर्वात आधी 12 जुलै रोजी तुळशी तलाव भरून वाहू लागला. त्यानंतर तीनच दिवसांनी 25 जुलै रोजी तानसा धरण भरलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मोडकसागरही ओसंडून वाहू लागलं. दुसरीकडे मध्य वैतरणा धरणाचे दरवाजे 27 जुलै रोजी उघडण्यात आले. तर भातसा धरणाचे पाच दरवाजे 29 जुलै रोजी उघडण्यात आलेत. दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 85.68 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

तर दुसरीकडे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमधील खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. तर पानशेत धरण 74.49 टक्के, वरसगाव 58. 88 टक्के आणि टेमघर 52.3 टक्के भरले असून या धरण क्षेत्रातही दमदार पाऊस कोसळत आहे.