Congress: काँग्रेसच्या ‘चिंतना’चा इम्पॅक्ट, नसीम खान यांचा मुंबई काँग्रेसच्या प्रचार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

| Updated on: May 24, 2022 | 4:38 PM

Congress: एक व्यक्ती एक पद असावे या निर्णयानंतर महाराष्ट्रातून राजीनामा देणारे नसीम खान हे पहिले पदाधिकारी ठरले आहेत. नसीम खान यांनी स्वत:हून त्यांच्याकडील दोन पैकी एका पदाचा राजीनामा दिला आहे.

Congress: काँग्रेसच्या चिंतनाचा इम्पॅक्ट, नसीम खान यांचा मुंबई काँग्रेसच्या प्रचार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा
परिषदेच्या उमेदवारींनंतर नाराजीची लाट, हंडोरेंनी पक्षासाठी काय केलं? नसीम खान यांचा एच. के. पाटलांना सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राजस्थानच्या उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या (congress) नव संकल्प चिंतन शिबिराचा (nav sankalp shivir) चांगलाच इम्पॅक्ट जाणवू लागला आहे. या शिबिरात एक व्यक्ती एक पदाची काँग्रेसने घोषणा केली. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातून सुरू झाली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान (naseem khan) यांनी याची सुरुवात करत मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.नसीम खान यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष अशी दोन पदे होती. प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेसच्या बैठकीत नसीम खान यांनी राजीनाम्याची घोषणा केली व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे आपला राजीनामा पाठवला आहे. नसीम खान यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही आता आपले पद सोडावे लागणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्षांतर्गत फेरफार सुरुवात करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच हा परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे.

एक व्यक्ती एक पद असावे या निर्णयानंतर महाराष्ट्रातून राजीनामा देणारे नसीम खान हे पहिले पदाधिकारी ठरले आहेत. नसीम खान यांनी स्वत:हून त्यांच्याकडील दोन पैकी एका पदाचा राजीनामा दिला आहे. याबद्दल महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांनी त्यांचे कौतुक केले आहे. नसीम खान यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष अशी दोन पदे होती. त्यातील मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

उदयपूरमध्ये काय घडलं?

उदयपूरमध्ये काँग्रेसचं नव संकल्प चिंतन शिबीर नुकतच पार पडलं. या शिबिरात काँग्रेसला नव संजीवनी देण्यासाठी चर्चा करण्यात आली होती. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली होती. या बैठकीत एक व्यक्ती एक पदाचा निर्णय घेण्यात आला. तसेच कुटुंबातील एकाच व्यक्तीला पद देण्याचा निर्णय घेण्यात आला. कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला पक्षात पाच वर्ष पूर्ण झाल्यावरच त्याला पद देण्याचंही ठरलं. त्याशिवाय ज्येष्ठांऐवजी तरुणांना पक्षात पुरेसा वाव आणि संधी देण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच गांधी जयंतीपासून भारत जोडो अभियानास सुरुवात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. स्वत: सोनिया गांधी या अभियानात भाग घेणार आहेत.

नसीम खान यांचा राजीनामा, नेक्स्ट कोण?

नसीम खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसच्या इतर नेत्यांवरही राजीनाम्याचा दबाव आला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडे दोन दोन तीन तीन पदे आहेत. त्यामुळे या नेत्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. त्याची सुरुवात नसीम खान यांनी केली आहे. आता नेक्स्ट कोण? असा सवाल केला जात आहे.