मुंबई : मागच्या 17 दिवसांपासून सुरु असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अखेर आज सुटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरवाली सराटी गावामध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढली. मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. “उपोषण सुटलं ही फार चांगली बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोहचले आहेत आणि ज्यूस पीऊन जरंगे पाटील यांनी उपोषण सोडलंय. ही महाराष्ट्रासाठी, मराठा बांधवांसाठी अत्यंत चांगली बाब आहे” असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले. “मराठा आरक्षण द्यावे ही सरकारची भूमिका आहे. त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या तांत्रिक अडचणी देखील लवकरच महाराष्ट्र सरकारकडून दूर होतील असा आम्हाला विश्वास आहे” असं दिलीप वळेस पाटील म्हणाले.
“सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरक्षण कसे टिकेल? कसं टिकवलं जाईल? कोर्टामध्ये काय होईल? यावर आता सध्या मी भाष्य करू शकणार नाही, पण कायदेशीररित्या यासाठी नक्कीच शासन दरबारी प्रयत्न केले जातील आणि मराठ्यांना न्याय दिला जाईल” असं दिलीप वळेस पाटील यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आंतरवाली सराटी गावात जातील अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री एकटेच गेले, त्यामुळे चर्चांना उधाण आलय. “अजित दादा जावो किंवा मुख्यमंत्री जावो, गोष्ट एकच आहे. दोघे राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सरकारचा एक महत्वाचा भाग म्हणून तिथे गेलेले आहेत” असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
‘काम होत आहे, हे महत्त्वाच आहे’
“अजित पवार आज मंत्रालयात आहेत. विविध कामांचा ते या ठिकाणी आढावा घेत आहेत. महाराष्ट्रातील विविध घडामोडी या ठिकाणी घडतात. बऱ्याच बैठका लावण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या बैठका अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. महाराष्ट्र पुढे जातोय, काम होत आहे, हे महत्त्वाच आहे” असं दिलीप वळेस पाटील यांनी सांगितलं.