फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडेही जा: नवाब मलिक

| Updated on: Jan 29, 2021 | 7:57 PM

उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा अन्य कुठलेही नेते असोत प्रत्येकाची आस्था असते. | Nawab Malik

फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडेही जा: नवाब मलिक
नवाब मलिक
Follow us on

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत. त्यामुळे लोकांनी केवळ अयोध्येत जाण्याऐवजी बद्रीनाथ किंवा पशुपतीनाथ येथेही जावे, असे नवाब मलिक यांनी म्हटले. (Why BJP leaders only visit Ayodhya they should also visit Char dham)

ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयीही विचारणा करण्यात आली. तेव्हा नवाब मलिक यांनी प्रत्येकाला आपापली आस्था जपण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा अन्य कुठलेही नेते असोत प्रत्येकाची आस्था असते. या देशात प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे. हा प्रत्येक नागरिकाचा मौलिक अधिकार आहे. त्यामुळे ते त्यांना हवं त्याठिकाणी जाऊ शकतात, असे मलिक यांनी म्हटले.

‘कोणी कोणासोबत युती करावी, हा त्यांचा अधिकार’

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्याने आता राज्यात पुन्हा एकदा मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे. याविषयी विचारणा केली असता नवाब मलिक यांनी, कोणी कोणासोबत युती करावी, हा त्यांचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले.

‘या’ एकाच अटीवर भाजप मनसेशी युती करेल; चंद्रकांत पाटील म्हणाले….

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) परप्रांतीयांबाबतची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत भाजप त्यांच्याशी युती करणार नाही, असे महत्त्वाचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने आता राजकारणात नवा ट्विटस्ट आणला आहे. मुळे आता राज ठाकरे भाजपशी युती करण्यासाठी ही अट मान्य करणार का, हे आता पाहावे लागेल.

संबंधित बातम्या:

राज ठाकरे एका गोष्टीवर ठाम नसतात, सतत भूमिका बदलतात; अयोध्या दौऱ्यावरुन काँग्रेसचे टीकास्त्र

राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचीही घोषणा, अयोध्येला जाणार!

(Why BJP leaders only visit Ayodhya they should also visit Char dham)