मुंबई : आरेमध्ये झाडे तोडून मेट्रो कारशेड (Aarey metro carshed) बनवू नये, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. आज राष्ट्रवादीसह विविध पक्ष आणि संघटनांनी आरेमधील मेट्रो कारशेडविरोधात एकत्र येत आंदोलन केले. आरेऐवजी कुठेतरी मेट्रो कार्ड संच बनवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेड बनवण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होणार आहे. यामुळेच सरकारच्या या निर्णयाला विविध पक्ष आणि संघटनांकडून विरोध (Protest) होत आहे. अनेक पर्यावरणवादी संघटनादेखील याठिकाणी आंदोलने करीत आहेत. मागील आठवड्यात काँग्रेसने मोठे आंदोलन याठिकाणी केले होते. तर आज राष्ट्रवादीसह (NCP) विविध पक्ष आक्रमक होत, घोषणाबाजी करत आंदोलन करीत आहेत. हातात फलक घेऊन, सरकारच्या विरोधात आणि आरे वाचविण्याच्या घोषणा आंदोलक देताना दिसत होते.
मुंबईची सध्याची स्थिती पाहत शहरात प्रचंड प्रदुषण झाले आहे. पर्यावरणाची मोठी हानी होताना दिसून येत आहे. आम्ही मुंबईत लहानाचे मोठे झालो. मुंबई हीच आमची कर्मभूमी आहे. त्यामुळे या प्रदुषणाच्या विरोधात मुंबईकर एकवटले आहेत. या आंदोलनात सर्व मूळ मुंबईचे रहिवासी सहभागी झाले आहेत, असे राष्ट्रवादीच्या नेत्या आणि आर्ट कल्चर फिल्म सेंटरच्या मुंबई प्रेसिडेंट डॉ. देवयानी बेंद्रे म्हणाल्या.
मुंबईकरांना आरेची काय किंमत आहे, याची जाणीव आहे. आता येथे जी हिरवळ दिसत आहे, भविष्यात ती दिसेल याची गॅरंटी नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आहोत. सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, इथे हुकूमशाही नाही. राष्ट्रवादी संविधानानुसार चालणारा पक्ष आहे. जर संविधानाच्या विरोधात कुणी गेले तर त्याला जनताच धडा शिकवते, असा इशाराही बेंद्रे यांनी दिला आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. अशावेळी सरकारला जर हुकूमशाही पद्धतीने वागायचे असेल, तर वागू द्या. हीच हुकूमशाही लोक मुळासकट उघडून टाकतील. ही आमची, मुंबईकरांची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे सरकारला असे करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. या ईडी सरकारला मुंबईकर धडा शिकवतील, असा इशारा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पंकज चंदनशिवे यांनी दिला आहे.