मुंबईत पाणी तुंबलं नाही, महापौर विश्वनाथ महाडेश्वरांचा दावा

| Updated on: Jul 01, 2019 | 4:39 PM

अवघ्या 5 दिवसात मुंबईची तुंबई झालेली असताना दुसरीकडे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी "मुंबई कुठेही तुंबली नाही, मुंबईत सर्व काही आलबेल सुरु आहे. तुम्ही उगाच प्रश्न निर्माण करु नका", असा अजब दावा केला आहे.

मुंबईत पाणी तुंबलं नाही, महापौर विश्वनाथ महाडेश्वरांचा दावा
Follow us on

मुंबई : मुंबईसह राज्यात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईसह इतर ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे आज (1 जुलै) संपूर्ण दिवसभर मुंबईतील रस्ते, रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. तर मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखणाऱ्या रेल्वेच्या तिन्ही रेल्वेमार्ग काही काळासाठी ठप्प झाले होत्या. यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलचा अंसख्य मुंबईकरांचा लेटमार्क लागला आहे. अवघ्या 5 दिवसात मुंबईची तुंबई झालेली असताना दुसरीकडे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी “मुंबई कुठेही तुंबली नाही, मुंबईत सर्व काही आलबेल सुरु आहे. तुम्ही उगाच प्रश्न निर्माण करु नका“, असा अजब दावा केला आहे. महापौरांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. महापौरांच्या या वक्तव्यानंतर सर्व मुंबईकरांना हसावं की रडावं असा प्रश्न आता पडला आहे.

मुंबईसह राज्यात गुरुवार (27 जून) पासून पावसाला सुरुवात झाली. मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यानंतर असंख्य मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र मुंबईतील या पावसामुळे पालिकेच्या कामकाजाचे तीन तेरा वाजवले. मुंबईत पहिल्याच दिवशी 27 जूनला काही ठिकाणी पाणी तुंबले, झाडे कोसळली, भिंत कोसळल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी (28 जून) मुंबईत हेच चित्र पाहायला मिळाले. मात्र या दोन्ही दिवशी मुंबईकरांनी पहिल्या पावसाचा आनंद घेतला.

शनिवारी (29 जून) आणि रविवारी (30 जून) मुंबईत पावसाची उघडझाप सुरु होती. मात्र विकेंन्ड असल्याने मुंबईकरांना तितकासा फरक जाणवला नाही. पण त्यानंतर रविवारी 30 जूनला रात्री 10 नंतर मुंबईत मुसळधार पाऊस कोसळू लागला. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीच हिंदमाता, परेल, दादर, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा यासारख्या सखल भागात पाणी तुंबण्यास सुरुवात झाली.

मुंबईचे जनजीवन अद्याप विस्कळीत

यानंतर आज सोमवारी (1 जुलै) महिन्याचा आणि आठवड्याचा पहिला दिवस.. रविवारी मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने सोमवारीही सतंतधार सुरु होती. यामुळे मुसळधार पावसामुळे मुंबईसह इतर ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे दिवसभर मुंबईतील रस्ते, रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. तर मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखणाऱ्या रेल्वेच्या तिन्ही लाईन्स काही काळासाठी ठप्प झाल्या होत्या. दरम्यान आता कुठे मुंबईतील पाणी ओसरले असले, तरी मुंबईची लाईफलाईन मात्र अद्याप विस्कळीत आहे.

काय म्हटले महापौर? 

याबाबत टीव्ही 9 मराठीने मुंबईचे महापौर या नात्याने विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांना तुम्ही पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासन सज्ज आहे असा दावा केला होता, मात्र तरीही मुंबई तुंबली असा प्रश्न उपस्थित केला होता.

त्याचे उत्तर देताना महापौरांनी “मुंबई कुठेच तुंबली नाही, तुम्ही उगाच प्रश्न निर्माण करत आहात,  मुंबईत सारं काही आलबेल सुरु आहे.  कुठेही पाणी तुंबलेलं नाही, अथवा ट्रॅफिक जाम नाही, त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालेले नाही हे मी तुम्हाला सांगू शकतो,” असा अजब दावा त्यांनी केला.

तसेच मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. मात्र त्या ठिकाणी पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपाद्वारे पाण्याचा निचरा करण्यात आला. तसेच काही ठिकाणी गाड्या या सिग्नल लागल्याने उभ्या होत्या, असा आणखी एक अजब दावाही महापौरांनी केला आहे.

“त्याशिवाय मुंबईचा महापौर म्हणून मी सर्व ठिकाणी फिरलो मात्र मला कुठेही पाणी तुंबलेले दिसले नाही. त्यामुळे मुंबईचे जनजीवन सुरळीत सुरु असून मुंबईतील सर्व शाळा,कॉलेज सुरु आहे. लोक कामावरही  गेले आहेत. त्यामुळे मुंबई पूर्वपदावर आहे”, असेही त्यांनी सांगितले. तसेच मुंबईत ट्राफिक नेहमीच जाम असते, यासाठी आम्ही विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. पण कचरा किंवा प्लास्टिक अडकल्याने पाणी मुंबईत पाणी साठते असेही महापौरांनी सांगितले.”

विशेष म्हणजे तुम्ही मला पाणी कुठे तुंबले हे दाखवा, मी  त्या ठिकाणी तुमच्या सोबत प्रशासनला घेऊन येतो असेही त्यांनी सांगितले. तसेच अनेक ठिकाणी झाडे कोसळली नसून त्याच्या फांद्या पडल्या आहेत, असेही महापौरांनी सांगितले.