पोलीस भरतीत तो जीव तोडून धावला, अंतिम रेषाही गाठली, अन् जमिनीवर कोसळला

| Updated on: Feb 18, 2023 | 11:23 AM

गणेश उगले याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यातून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे. या प्रकारामुळे उपस्थिताना चांगलाच धक्का बसला आहे.

पोलीस भरतीत तो जीव तोडून धावला, अंतिम रेषाही गाठली, अन् जमिनीवर कोसळला
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी पोलीस भरती (Police Recuritment) प्रक्रिया सुरु आहे. राज्यात 18 हजार 331 पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रिया (Police Bharti) सुरु आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून उमेदवार येत आहेत. विदर्भातून मुंबईत आलेल्या एका उमेदवाराने शारीरिक चाचणीसाठी 1600 मीटरची धाव घेतली. तो जीव तोडून धावला, अंतिम रेषाही गाठली. अन् चाचणी पुर्ण होताच तो जमिनीवर कोसळला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. गणेश उगले असे मृत उमेदवाराचे नाव आहे.

राज्यभरात पोलीस दलासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. तशी प्रक्रिया मुंबई पोलिस दलासाठी सुरू आहे. यासाठी मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेला गणेश उगले (वय २६) चुलत भावाबरोबर सहभागी झाला. शुक्रवारी सकाळी तो मुंबईतील कलिना विद्यापीठाच्या मैदानावर चाचणीसाठी उतरला.

हे सुद्धा वाचा

गणेश १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली आणि तो खाली कोसळला. भरती प्रक्रियेसाठी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने तात्काळ त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी गणेशच्या चुलत भावाकडे चौकशी केली असता, त्याने कोणत्याही अस्वस्थतेची तक्रार केली नव्हती.

शवविच्छेदनातून समजणार


गणेश उगले याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यातून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे. या प्रकारामुळे उपस्थिताना चांगलाच धक्का बसला आहे.

पुण्यातील प्रक्रियेस स्थगिती

18 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान भरती प्रक्रिया बंद ठेवण्यात येणार आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. सुरुवातीला 500 उमेदवारांची भरती प्रक्रिया होत होती. परंतु, नंतरच्या काळात दोन हजार उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरु झाली.

66 हजार 142 अर्ज आले होते

पुणे पोलीस दलातील जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. 720 पोलिस शिपाई पदासाठी तब्बल 66 हजार 142 अर्ज आले होते. पोलीस शिपाई आणि चालक पदाकरिता भरती होणार होती. चालक पदाकरिता 6 हजार 843 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. या जागा भरण्यासाठी तीन जानेवारीपासून प्रक्रिया राबवणे सुरु होते. परंतु कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान भरती प्रक्रिया बंद ठेवण्यात येणार आहे.