शिवसेनेचे काहीही होऊ दे, पण सरकार पाच वर्ष टिकलं पाहिजे, हा तर राऊतांचा एकतर्फी कार्यक्रम; दरेकरांची टीका

| Updated on: Sep 21, 2021 | 7:33 PM

शिवसेनेचं काहीही झालं तरी चालेल पण सरकार पाच वर्ष टिकलं पाहिजे, असा एकतर्फी कार्यक्रम शिवसेना नेते संजय राऊत यांनी हाती घेतला आहे. (pravin darekar)

शिवसेनेचे काहीही होऊ दे, पण सरकार पाच वर्ष टिकलं पाहिजे, हा तर राऊतांचा एकतर्फी कार्यक्रम; दरेकरांची टीका
political leader
Follow us on

मुंबई: शिवसेनेचं काहीही झालं तरी चालेल पण सरकार पाच वर्ष टिकलं पाहिजे, असा एकतर्फी कार्यक्रम शिवसेना नेते संजय राऊत यांनी हाती घेतला आहे. त्यामुळेच राऊतांची दिवस न् रात्र धावपळ सुरू असते, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. (pravin darekar reaction on cm uddhav thackeray’s letter to governor bhagat singh koshyari)

प्रविण दरेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सामना अग्रलेखातून टीका करताना महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्य स्थिति काय आहे, याचं भान राऊत यांना नाही. त्यांचा फक्त एकतर्फी कार्यक्रम सुरू आहे. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्यामुळे आघाडी सरकार आलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे काहीही होऊदे. परंतु, 5 वर्ष हे सरकार टिकलं पाहिजे यासाठी केवळ राऊत यांची धावपळ सुरू असल्याचा टोलाही दरेकर यांनी लगावला.

मुश्रीफांच्या बाहुतील बळ तपासण्यात व्यस्त

शिवसेना खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या शक्तीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. परंतु, कोल्हापुरचे पैलवान गडी हसन मुश्रीफ यांच्या बाहुत किती बळ आहे हे सांगण्यातच सध्या राऊत व्यस्त आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस बद्दल एवढं आंधळं प्रेम संजय राऊत दाखवत आहेत. पवार यांच्याबद्दल निष्ठा व्यक्त करतानाच, महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी संजय राऊत शिवसेनेचं किती नुकसान करणार आहे, हे येणाऱ्या काळात समजेल अशी टीकाही त्यांनी केली आहे.

राऊतांना सवाल

ईडी, सीबीआय यंत्रणेचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत असल्याचे सांगताना राज्यात आघडी सरकारमध्येही तपास यंत्रणांचा कसा गैरवापर चालला आहे हे राऊत सांगायला विसरत आहे का? असा सवाल करतानाच राणे यांना तातडीने अटक करण्यात आली. किरीट सोमय्या यांना कारण नसतानाही 6 तास नजरकैदेत ठेवलं. एका लहान मुलीने केवळ उद्धव ठाकरे यांचं मीम्स फॉरवर्ड केलं म्हणून तिच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला, रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. अभिनेत्री कंगना रणावातचे ऑफिस घाईघाईत पाडण्यात आलं. मग त्यामध्ये तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला नाही का? अतुल भातखळकर, चित्रा वाघ, किरीट सोमय्या यांना धमक्यांचे फोन आल्यानंतरही त्याची साधी चौकशी सुद्धा झालेली नाही. त्यांची तुम्हाला काळजी नाही का? ज्येष्ठ गायिका लता दीदी, सचिन तेंडुलकर, अमिताभ यांची ट्विटरची चौकशी करावी ही भाषा महाविकास आघाडी सरकारचीचं होती. या सगळ्या गोष्टींचा सोयीस्कर विसर राऊत यांना पडला आहे का? असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचं सांगत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली होती. परंतु राज्यपालांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी पाठविलेले उत्तर हे राजकीय स्वरुपाचे आहे, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात विनयभंग, अत्याचार, बलात्कार, हत्येच्या घटना हजारोंच्या संख्येनं झाल्या आहेत. त्यातच साकीनाक्याची घटना तर परिसीमा होती. मग अशावेळी राज्यापालांनी, वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी, महिला संघटनांनी मागणी केली असेल, तर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घ्यायला काहीच हरकत नाही. तसेच हे अधिवेशन केवळ टीका-टिप्पणीसाठी नाही. विरोधकही या विषयात काही चांगल्या सूचना सरकारला सुचवू शकतील. महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था सक्षम होण्यास अजून मदत होईल, या भूमिकेतून याकडे पाहिलं पाहिजे, असा सल्लाही दरेकर यांनी यावेळी ठाकरे सरकारला दिला. (pravin darekar reaction on cm uddhav thackeray’s letter to governor bhagat singh koshyari)

 

संबंधित बातम्या:

तुम्ही देवभूमीचे सुपुत्र, पण उत्तराखंडात महिला अत्याचारांवरील घटनांत दीडशे टक्क्याने वाढ; मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दाखवला आरसा

गुजरातमध्ये बलात्काराच्या रोज 3 घटना, मग तिथे एक महिन्यांचे विशेष अधिवेशन बोलवावे लागेल; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

पंजाबच्या राजकारणात दलितांचं स्थान काय?; आंबेडकरी विचारांचा प्रभाव किती?

(pravin darekar reaction on cm uddhav thackeray’s letter to governor bhagat singh koshyari)