VIDEO: राजभवनात थुई थुई नाचणारे मोर आणि विषारी नागही येतात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

| Updated on: Feb 11, 2022 | 6:20 PM

राजभवनाच्या दरबार हॉलच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. राजभवनात थुई थुई नाचणारे मोर येतात. तसेच विषारी नागही येतात. अनेकदा आपण त्यांचे फोटो पाहत असतो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोले लगावले.

VIDEO: राजभवनात थुई थुई नाचणारे मोर आणि विषारी नागही येतात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
राजभवनात थुई थुई नाचणारे मोर आणि विषारी नागही येतात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
Follow us on

मुंबई: राजभवनाच्या (rajbhavan) दरबार हॉलच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. राजभवनात थुई थुई नाचणारे मोर येतात. तसेच विषारी नागही येतात. अनेकदा आपण त्यांचे फोटो पाहत असतो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी विरोधकांना टोले लगावले. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले राजभवन हे देशातील सर्वोत्तम राजभवन आहे. बाजूलाच गर्द हिरवी झाडे आहेत. अशी वास्तू अन्यत्र शोधूनही सापडणार नाही. या राजभवनात आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांच्यासोबत माजी राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंह यांना तसेच अनेक राज्यपालांना भेटलो होतो. आता राजभवनातील हा नवा दरबार हॉल सशक्त लोकशाहीतील घडामोडी पाहण्यासाठी सुसज्ज झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते राजभवनातील नवीन दरबार हॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्रीमती सविता कोविन्द, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर, वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोलेही लगावले. आपलं राजभवन कदाचित हे देशातील सर्वोत्तम राजभवन असेल. या वास्तुला 50 एकरची जागा लाभली आहे. एका बाजूला अथांग समुद्र आहे. दुसऱ्या बाजूला गर्द हिरवीगार झाडी आहेत. या परिसरातील हवा थंड असते. राजकीय हवा कशी असू द्या. पण मलबारहिलची हवा चांगली असते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

वारसा जपून नुतनीकरण

राजभवनाच्या जुन्या दरबार हॉलचा वारसा जपून त्याचे नूतनीकरण केल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. राजभवनाने पारतंत्र्यातील काळ पाहिला तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सोहळा पाहिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते दरबार हॉलच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच प्रवेशद्वार पूजन करण्यात आले. यावेळी दरबार हॉलचा इतिहास सांगणारा माहितीपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. नितीन आरेकर यांनी केले तर राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी आभार प्रदर्शन केले.

असा आहे दरबार हॉल

>> राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला आहे. त्याची आसन क्षमता 750 इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता 225 इतकी होती.

>> जुन्या दरबार हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहाला बाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी ही अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

>> स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजभवनातील दरबार हॉल शपथविधी सोहळे, शासकीय कार्यक्रम, पोलीस अलंकरण समारोह, शिष्टमंडळाच्या भेटी तसेच लहान मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्थळ म्हणून ओळखला जाऊ लागला.

>> इंग्लंडचे महाराजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या 1911 साली झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता. त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तुरचनाकार जॉर्ज विटेट यांची होती.

>> शंभर वर्षांहून अधिक काळ लाटा व वादळ-वाऱ्यांचे तडाखे सहन केल्यामुळे पूर्वीचा दरबार हॉल अतिशय जीर्ण झाला होता. त्यामुळे 2016 नंतर त्याचा वापर थांबविण्यात आला व कालांतराने त्याजागी नवा अधिक क्षमतेचा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला.

>> नव्या दरबार हॉलचे बांधकाम 2019 साली सुरु झाले. मात्र कोविडच्या उद्रेकामुळे बांधकामाची गती मंदावली कालांतराने बांधकाम पुनश्च सुरु झाले व डिसेंबर 2021 मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.

दरबार हॉलचा इतिहास

>> दरबार हॉल हे आयताकृती सभागृह सन 1911 साली बांधण्यात आले होते. राज्यपालांचे निवासस्थान असलेली ‘जलभूषण’ ही वास्तू तसेच राज्यपालांचे सचिवालय यांच्या मधल्या जागेत दरबार हॉल बांधण्यात आला.

>> दरबार हॉलच्या भव्य पोर्चच्या दर्शनी भागात जमिनीखाली राजभवनातील ऐतिहासिक तळघराचे (बंकर) प्रवेशद्वार आहे. इथून नागमोडी वळणे घेत हे तळघर ‘जलचिंतन’ या अतिथीगृहाखालून उघडते.

>> 10 डिसेंबर 1956 साली श्री प्रकाश यांनी जुन्या द्विभाषिक मुंबई राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली त्यावेळी दरबार हॉलचे नाव ‘जल नायक’ असे होते.

>> दरबार हॉलच्या समोरील आणि मागील बाजूंना ‘जीवन वृक्ष’ ही संकल्पना असलेली सिल्क वस्त्रावर केलेली मोठी पेंटिंग्स होती.

>> बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थितीत राज्यपालांना विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते. त्यामुळे ‘दरबार हॉल’ किंवा ‘जल सभागृह’ हा राजभवनातील सर्वात व्यस्त परिसर असतो.

संबंधित बातम्या:

आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र, भारताचं महान राज्य; राष्ट्रपतींकडून मराठीतून महाराष्ट्राचा गौरव

राजकीय हवा कशीही असू द्या, मलबार हिलची हवा चांगली असते; मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी

CRIME : म्हणे सोहळा वास्तुशांतीचा, डाव मांडला अल्पवयीनांचा, औरंगाबादेत पोलिसांची मोठी कारवाई!