सचिन वाझे प्रकरणी राज्य सरकारची भूमिका चुकीची, एनआयएमुळे सत्य समोर येईल : रामदास आठवले

| Updated on: Mar 15, 2021 | 6:40 PM

सचिन वाझे प्रकरणी राज्य सरकारची भूमिका चुकीची असून एनआयएची कारवाई योग्य असल्याचं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय.

सचिन वाझे प्रकरणी राज्य सरकारची भूमिका चुकीची, एनआयएमुळे सत्य समोर येईल : रामदास आठवले
रामदास आठवले आणि सचिन वाझे
Follow us on

मुंबई : सचिन वाझे प्रकरणी राज्य सरकारची भूमिका चुकीची असून एनआयएची कारवाई योग्य असल्याचं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. तसेच या प्रकरणातील सत्य लवकरच जनतेसमोर येईल, असंही नमूद केलं. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने संशयास्पद अधिकारी वाझेला पाठिशी घातल्याचाही आरोप त्यांनी केला (Ramdas Athawale criticize MVA Government over API Sachin Vaze case).

रामदास आठवले म्हणाले, “उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांची गाडी आढळल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) केलेल्या तपासात गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. या प्रकरणात असणारी स्कॉर्पियो गाडीच्या मागे असणारी युनोव्हा गाडी ही क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझेची असल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले. या प्रकरणी सुरुवातीपासून राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने चुकीची भूमिका घेतली. तसेच संशयास्पद सचिन वाझेला पाठीशी घालण्याची चुकीची भूमिका घेतली. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने अत्यंत योग्य कारवाई केली आहे.”

“राज्य सरकारने सचिन वाझेला पाठीशी घालण्याचा चुकीचा प्रयत्न केला”

“या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सचिन वाझेला अटक करण्याची मागणी सुरुवातीपासून केली. मात्र राज्य सरकारने सचिन वाझेला पाठीशी घालण्याचा चुकीचा प्रयत्न केला. असे अधिकारी मुंबई पोलिसांच्या चांगल्या प्रतिमेला बाधा ठरतात,” असंही रामदास आठवले म्हणाले.

“लाखो रोजगार देणाऱ्या अंबानींच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी करण्यात आली”

रामदास आठवले म्हणाले, “उद्योजक मुकेश अंबानी यांनी लाखो लोकांना रोजगार दिला आहे. त्यांच्या घरासमोर स्फोटकांची स्कॉर्पियो उभी करण्यात आली. ती स्कॉर्पियो गाडी चोरून आणली होती. त्या गाडीमागे असणारी युनोव्हा गाडी क्राईम ब्रँचचे अधिकारी सचिन वाझेची होती. हे सत्य चौकशीत समोर आले आहे. त्या स्कॉर्पियो गाडीचा मालक मनसुख हिरेन याचीही हत्या झाल्याचा संशय आहे.”

“या प्रकरणात सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांना अटक करा अशी मागणी विरोधी पक्ष करीत होता. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी सचिन वाझेला अटक केली नाही. महाराष्ट्र पोलिसांवर महाराष्ट्र् सरकारचा दबाव होता. राज्य सरकार सचिन वाझेला पाठीशी घालत होते. मात्र, या प्रकरणी एनआयएने केलेली कारवाई अत्यंत योग्य आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास वाढविणारी कारवाई ठरली आहे. या प्रकरणात एनआयएमुळे सत्य समोर येईल,” असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Riyaz Kazi : वाझेनंतर NIA चौकशी करत असलेले API रियाझ काझी कोण आहेत?

वाझेंची भूमिका उघडी पडते आहे पण काझी आणि API होवाळ का रडारवर? वाचा सविस्तर

पवारसाहेब जाणते राजे, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवा, भाजपकडून जोर

व्हिडीओ पाहा :

Ramdas Athawale criticize MVA Government over API Sachin Vaze case