‘कोरोना को मत डरोना, नियम पाळा, कोरोनाला जाळा’, रामदास आठवलेंची नवी कविता

| Updated on: Nov 29, 2020 | 6:57 PM

"मी 20 फेब्रुवारीला 'गो कोरोना'चा नारा दिला. कोरोना वाढतोय, त्यावर मी कविता केलीय. पण कोरोनाने मलाही सोडलं नाही", असं रामदास आठवले म्हणाले (Ramdas Athawale poem on Corona).

कोरोना को मत डरोना, नियम पाळा, कोरोनाला जाळा, रामदास आठवलेंची नवी कविता
केंद्रीय मंत्री रामदास आठवले
Follow us on

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोनावर कविता लिहिली आहे. त्यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ही कविता बोलून दाखवली. “गो कोरोना गो, कोरोना गो, नो कोरोना नो कोरोना नो, कोरोना को मत डरोना, गर्दी टाळा, नियम पाळा आणि कोरोना जाळा”, अशा कवितेच्या ओळी त्यांनी मुलाखतीत बोलून दाखवल्या (Ramdas Athawale poem on Corona).

“मी 20 फेब्रुवारीला ‘गो कोरोना’चा नारा दिला. कोरोना वाढतोय, त्यावर मी कविता केलीय. पण कोरोनाने मलाही सोडलं नाही. मलाही कोरोना झाला. त्यामुळे मी नवी कविता करतोय, “गो कोरोना गो, कोरोना गो.. नो कोरोना नो कोरोना नो.., कोरोना को मत डरोना, गर्दी टाळा, नियम पाळा आणि कोरोना जाळा”, असं रामदास आठवले म्हणाले (Ramdas Athawale poem on Corona).

दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि ‘सामाना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांच्या ‘सामना’तील ‘रोखठोक’ सदरात महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता स्थापनेबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. “मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. विधानसभेचे अध्यक्ष पद कुणाकडे? हा यातील शाब्दिक चकमकीचा मुद्दा होता”, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे. याच मुद्द्याचा धागा पकडत रामदास आठवलेंनी टीका केली.

“नेहरु सेंटरमधील बैठकीत शरद पवार यांचा विधानसभेचे अध्यक्ष पद राष्ट्रवादीला मिळावं, असा आग्रह होता. पण शेवटी कॉम्प्रमाईज करावं लागलं. त्यावेळी भाजप नेते अमित शाह आणि शरद पवार यांच्यातही चर्चा सुरु होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता बनत नसेल तर भाजप-राष्ट्रवादी अशी सत्ता स्थापन करु, अशी चर्चा होती”, अशी माहिती आठवले यांनी दिली.

“सरकार आगामी काळात पडेल का, हे आता तरी सांगता येणार नाही. पण येत्या काळात वादामुळे हे सरकार पडेल असं वाटतं”, असं मत आठवलेंनी मांडलं.

“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि आरपीआय एकत्र लढेल. मागच्यावेळी 82 जागा आल्या होत्या. यावेळी भाजप आणि आरपीआय जागा वाढणार. सत्ता स्थापन करण्याचा फटका सेनेला मनपात बसणार. आम्ही महाविकास आघाडीसोबत महापालिका निवडणुकीत एकत्र लढणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे. शिवसेना सेक्युलर झालीय की कांग्रेस, राष्ट्रवादीने हिंदुत्व स्वीकारलंय का, याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे”, असं त्यांनी सांगीतलं.

“आमचा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणं गरजेचं आहे. उलट मराठा आरक्षणासाठी सगळ्यात आधी मी आंदोलन केलं”, असं आठवले म्हणाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मतावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. शेतकऱ्यांना पंजाब हरियाणात भडकवण्याचं काम होतंय, असंदेखील मत आठवले यांनी मांडलं.

हेही वाचा :

विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? सत्तास्थापनेपूर्वीच्या बैठकीत शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक चकमक, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

सरकारचं एक वर्षातलं अचिव्हमेंट काय? फडणवीसांच्या टीकेला सामंतांचं प्रत्युत्तर

वर्षभरातील सरकारची कामगिरी शोभणारी नाही, जनता ठाकरे सरकारला नापास ठरवेल : रामदास आठवले