“शेती विरोधी कायदे मागे घ्या”, 10 लाख सह्यांचं निवेदन देत राष्ट्र सेवा दलाची राज्यपालांकडे मागणी

| Updated on: Mar 01, 2021 | 2:17 AM

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने देशभरात 10 लाख सह्या गोळा करण्यात आल्या.

शेती विरोधी कायदे मागे घ्या, 10 लाख सह्यांचं निवेदन देत राष्ट्र सेवा दलाची राज्यपालांकडे मागणी
Follow us on

मुंबई : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने देशभरात 10 लाख सह्या गोळा करण्यात आल्या. तसेच या सह्यांसह मागण्यांचं निवेदन राष्ट्र सेवा दलाच्यावतीने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देण्यात आले. या सह्यांमध्ये महाराष्ट्रातून 6 लाख सह्या गोळा करण्यात आल्या आहेत (Rashtra Seva Dal demand cancelation of Farm Laws to Governor Bhagat Singh Koshyari).

राष्ट्र सेवा दलाने म्हटलं आहे, “केंद्र सरकारने संसदेत पारित केलेले तिन्ही शेती विषयक कायदे शेतकरी विरोधी आहेत. त्यातून देशातील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. या कायद्यांच्या विरोधात गेली 3 महिने राजधानी दिल्लीच्या सरहद्दीवर शेतकऱ्यांचं अभूतपूर्व अहिंसक आंदोलन सुरु आहे. त्याची दखल घेण्याऐवजी हे शेतकरी आंदोलन निर्दयपणे दडपण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेती विरोधी तिनही कायदे ताबडतोब मागे घेण्याची आम्ही मागणी करतो. यासाठी ही सह्यांची मोहीम घेण्यात आली.”

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत महाराष्ट्राभर 6 लाख 75 हजाराहून अधिक सह्यांची निवेदनं स्थानिक तहसिलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना सेवा दल पदाधिकारी आणि समविचारी कार्यकर्त्यांनी दिल्याचीही माहिती देण्यात आली.

माणुसकीच्या मुशीत घडलेल्या महाराष्ट्रा नम्र वंदन : गणेश देवी

या मोहिमेविषयी बोलताना गणेश देवी म्हणाले, “शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या माझ्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी गेले 3 आठवडे अविश्रांत पायपीट करून समर्थनाच्या सह्या गोळा केल्या. यात राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, शिक्षकभारती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लोकसंघर्ष मोर्चा, एनएपीएम, एस एम जोशी सोशालिस्ट फौंडेशन, विविध शेतकरी संघटना, श्रमिक संघटना, महाराष्ट्र सोशल फोरम, हमाल पंचायत, दक्षिणायन, साहित्यिक, कलाकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते सारे-सारे संवेदनशील प्रागतिक विचाराचे स्त्री-पुरुष सामील झाले.”

“पाहता-पाहता गोळा होणाऱ्या सह्यांचा आकडा 5 लाखाची संख्या ओलांडून गेला. यातून स्पष्ट झाले ते संपूर्ण महाराष्ट्राचे नैतिक साहस आणि शेतकऱ्यांच्या विषयीची अथांग आपुलकी. त्यासाठी आभार तरी कोणाचे आणि कसे मानायचे? बुलंद आणि एक आवाजात संपूर्ण महाराष्ट्र बोललोय, “शेतीविषयीचे ते तीन कायदे मागे घ्या.” या आवाजात ज्यांचे स्वर मिसळले त्या परिचयाच्या आणि अपिरिचित प्रत्येकाला माझा सलाम,” अशीही भावना गणेश देवींनी व्यक्त केली.

संबंधित संयुक्त निवेदन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देताना राष्ट्र सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शेतकरी नेते राजू शेट्टी आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे याही उपस्थित होत्या. याशिवाय राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख, आमदार कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, नितिन मते, राजा कांदळकर, अबिद शेख, चंद्रकांत म्हात्रे, सचिन बनसोडे, रोहित ढाले यांचाही शिष्टमंडळात समावेश होता.

हेही वाचा :

अदानी-अंबानी 21 व्या शतकातील इंग्रज, भाजप त्यांच्याच हातात देश देतोय : डॉ. गणेश देवी

‘केवळ प्रचाराने सत्य लपवता येणार नाही, लोकांच्या विचारशक्तीवर माझा विश्वास’, गणेश देवींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Photos : ‘घराला तोरण, दारात पणती आणि गोडधोड जेवण’, महाराष्ट्रात ‘सावित्री उत्सवाला’ जोरदार प्रतिसाद

व्हिडीओ पाहा :

Rashtra Seva Dal demand cancelation of Farm Laws to Governor Bhagat Singh Koshyari