Ravi Rana | रवी राणांची आजची रात्रही कोठडीतच! जामीनाची ऑर्डर तळोजा जेलमध्ये पोहोचलीच नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या राणा दाम्पत्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Ravi Rana | रवी राणांची आजची रात्रही कोठडीतच! जामीनाची ऑर्डर तळोजा जेलमध्ये पोहोचलीच नाही
रवी राणा, नवनीत राणा
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 6:59 PM

मुंबईः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असूनही आजची रात्र त्यांना कोठडीतच काढावी लागणार आहे. राणा दाम्पत्य यांना मुंबईतील तळोजा कारागृहात (Taloja Jail) ठेवण्यात आलं होतं. आज न्यायालयाने त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला. मात्र तळोजा कारागृहात त्यांच्या जामीनाच्या ऑर्डरची कॉपीच पोहोचली नाही. त्यामुळे आमदार रवी राणा यांना आजची रात्रही कोठडीतच काढावी लागणार आहे. नवनीत राणा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आज नवनीत राणा रुग्णालयात तर रवी राणा हे तळोजा कारागृहात मुक्कामी असतील.

आजचा मुक्काम का वाढला?

मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिलासा दिला असला तरीही काही तांत्रिक अडचणींमुळे रवी राणा यांना आजची रात्रही तळोजा जेलमध्येच काढावी लागणार आहे. तळोजा कारागृहात जामीनाची पत्र पेटी उघडण्याची शेवटची वेळ 5.30 मिनिटांची असते. मात्र या वेळेपर्यंत कोर्टातून मिळालेली ऑर्डर कॉपी जेलपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे त्या आमदार रवी राणा यांचा आणखी एका रात्रीचा मुक्काम वाढला आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनाही प्रकृती अस्वास्थ्यामुळे जेजे रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

कोणत्या अटींवर जामीन मंजूर?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या राणा दाम्पत्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी राणा दाम्पत्याने जामीनासाठी अर्ज केला होता. मुंबई सत्र न्यायालयात आज त्यांच्या अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र त्याआधी काही अटीदेखील घातल्या. राणा दाम्पत्याने जामीनावर असताना माध्यमांशी बोलू नये, अशी अट घालण्यात आली आहे.तसेच कायदा व सुव्यवस्था वेठीस धरू नये, पोलीस तपासातील पुराव्यांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये आदी अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन न केल्यास हा जामीन रद्द होऊ शकतो, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.