सीनियर PI असताना पोलिसाचं थरारक कृत्य, कुंटणखान्यातून मुलींना सोडवलं, दलालाच्या मदतीने पुन्हा तिथेच पाठवलं!

| Updated on: Jul 12, 2021 | 10:53 AM

कुंटणखान्यातून सुटका केलेल्या मुलींना कुटुंबाकडे न पाठवता, पुन्हा कुंटणखान्यात पाठवणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याला 15 वर्षांनी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कलंदर शेख असं या पोलिसाचं नाव आहे.

सीनियर PI असताना पोलिसाचं थरारक कृत्य, कुंटणखान्यातून मुलींना सोडवलं, दलालाच्या मदतीने पुन्हा तिथेच पाठवलं!
Follow us on

मुंबई : कुंटणखान्यातून सुटका केलेल्या मुलींना कुटुंबाकडे न पाठवता, पुन्हा कुंटणखान्यात पाठवणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याला 15 वर्षांनी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कलंदर शेख असं या पोलिसाचं नाव आहे. 2004 मध्ये नागपाडा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी असताना कलंदर शेखने हे कृत्य केलं होतं. चौकशीअंती दोषी आढळलेल्या कलंदर शेखला अटक करण्यात आली.  कलंदर शेखसह रवींद्र पांडे नावाच्या दलालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पदाचा गैरवापर करणं, आरोपींना कायद्याची मदत करणं असे अनेक गुन्हे कलंदर शेखवर ठेवण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?

एका स्वयंसेवी संस्थेने  2004 मध्ये 3 अल्पवयीन मुलींची कुंटणखान्यातून सुटका करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्या मुलींना त्यांच्या नातेवाईकांना न देता पुन्हा त्याच कुंटणखान्यात पाठवून दिल्याचा आरोप कलंदर शेखवर आहे.  याप्रकरणी एका आरटीआय कार्यकर्त्याने तक्रार केली होती. या तक्रारीनंतर डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात चौकशी करण्यात आली. याप्रकरणी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कलंदर शेख आणि दलाल पांडेचा सहभाग असल्याचं चौकशीत निष्पन्न झालं. या चौकशीत दोन्ही आरोपींविरोधात पुरावे आढळल्यानंतर शनिवारी दोघांना अटक करण्यात आलं. या आरोपींना 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. पुढील तपास अद्याप सुरु आहे.

कलंदर शेख निवृत्त झाला आहे. मात्र 2004 मधील त्याच्या भूमिकेवरील संशयानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. या चौकशीअंती अखेर कलंदर शेखला अटक करण्यात आली.

निवृत्तीनंतर कलंदर शेख औरंगाबादला गेला होता. कुंटणखान्यात मुलींना पाठवण्यात कलंदर शेखचा हात असल्याचं उघड होताच, त्याला औरंगाबादेतून अटक करण्यात आली. तर दलाल पांडेला कामाठीपुरात अटक करण्यात आली.