मुख्यमंत्री घराबाहेर पडले!, आता सर्वांनाच रेल्वे प्रवासाची मुभा द्या, मनसे पदाधिकारी संदीप देशपांडेची मागणी

| Updated on: Oct 21, 2020 | 11:18 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यावरुन मनसे पदाधिकारी संदिप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्याचबरोबर मुंबईत आता सर्वांसाठीच लोकल प्रवास सुरु करण्याची मागणीही देशपांडे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री घराबाहेर पडले!, आता सर्वांनाच रेल्वे प्रवासाची मुभा द्या, मनसे पदाधिकारी संदीप देशपांडेची मागणी
sandeep deshpande on cm uddhav thackeray
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यावरुन मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर आता सर्वांनाच लोकल प्रवासाची परवानगी द्या, अशी मागणीही देशपांडे केली आहे. ‘मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही चांगली गोष्ट आहे, ते बाहेर पडले म्हणजे कोरोना संपला असं म्हणावं लागेल’, अशी खोचक टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. (Sandeep deshpande on cm uddhav thackeray visit to osmanabad and local train)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात मातोश्री किंवा वर्षा निवासस्थानावरुन राज्याचा कारभार पाहात होते. संकट काळातही मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत अशी टीका सातत्यानं त्यांच्यावर होत असते. मागील आठवड्यात राज्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं. अशा संकटातही मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून सुरु होती. त्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी रविवारी सोलापूर तर आज उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी केली. हाच धागा पकडत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

‘मुख्यमंत्री इतके दिवस घरी बसून होते. आता बाहेर पडले आहेत. मुंबईत आजपासून सर्वसामान्य महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पण हे नियोजन शून्य आहे. कार्यालयाची वेळ सकाळची आणि प्रवासाची मुभा ११ नंतर. याचा उपयोग काय?’ असा सवाल संदिप देशपांडे यांनी राज्य सरकारला पर्यायानं मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री घराबाहेर पडत आहेत तर आता सर्वांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या, अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे.

आजपासून सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा, वेळमर्यादेवर नाराजी

लोकलमध्ये आता सरसकट सर्व महिलांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून सर्वसामान्य महिला लोकल प्रवास करु शकणार आहेत. पण सरकारच्या वतीनं महिलांना प्रवासासाठी वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि रात्री 7 वाजेनंतर लोकल बंद होण्यापर्यंत प्रवास करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, अनेक महिलांनी सरकारच्या वेळमर्यादेवर नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या:

सर्वसामान्य महिलांसाठी आजपासून लोकल प्रवास, पण वेळमर्यादेचा फायदा कुणाला? महिलावर्गाचा सवाल

मुंबईत महिलांना अखेर लोकलने प्रवासाची मुभा, पीयूष गोयल यांचे ‘नवरात्री’ गिफ्ट

Sandeep deshpande on cm uddhav thackeray visit to osmanabad and local train