मी रविवारी अत्यावश्यक सेवेचाच भाग असेन : संजय राऊत

| Updated on: Mar 20, 2020 | 5:12 PM

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी (22 मार्च) आवाहन केलेल्या जनता कर्फ्युचं स्वागत केलं आहे.

मी रविवारी अत्यावश्यक सेवेचाच भाग असेन : संजय राऊत
Follow us on

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी (22 मार्च) आवाहन केलेल्या जनता कर्फ्युचं स्वागत केलं आहे. पंतप्रधानांच्या जनता कर्फ्युच्या संकल्पनेचं आम्ही स्वागत करतो. त्या दिवशी मी स्वतः सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे असलो तरी अत्यावश्यक सेवेचाच भाग असेल असंही नमूद केलं. यामुळे रविवारी संजय राऊत (MP Sanjay Raut) अॅक्शन मोडमध्ये दिसणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधानांच्या जनता कर्फ्यु संकल्पनेचं आम्ही स्वागत करतो. ते योग्य आवाहन आहे. डॉक्टर्स, नर्स अत्यावश्यक सेवा देत आहेत यांचे आभार मानायलाच हवेत. सैनिक युद्धावर लढतात तसे ते सर्व आपली जबाबदारी पार पाडत आहेत. विषाणूशी लढा देत आहेत. मी स्वतः सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे असलो तरी अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून कामगिरी पार पाडत असतो. मी ‘सामना’त आहे आणि खासदार आहे. अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी रविवारी अत्यावश्यक सेवेचाच भाग असेन.”

जगात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना भारताने बऱ्यापैकी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या लढाईला भावनिक टच दिला आहे, पण आपण हे युद्ध म्हणून देखील पाहात आहोत, असंही संजय राऊत यांनी यावेळी मान्य केलं.

“उद्धव ठाकरेंचे काम इतिहासात नोंदवले जाईल”

संजय राऊत म्हणाले, “राज्य सरकार एका अग्निपरिक्षेतून तावून सुलाखून बाहेर पडल्यासारखी स्थिती आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा कस या महिनाभरात लागला. त्यांनी आपल्या कामातून लोकांना दाखवून दिलं आहे. मुख्यमंत्री म्हणून नाही, तर त्यांनी राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून राज्यातील जनतेची काळजी घेतली. राजकीय निर्णयावर सर्व टाळ्या वाजवतील. मात्र, त्यांनी एक वडील म्हणून जनतेची काळजी घेतली. त्यांचे काम इतिहासात नोंदवले जाईल. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा दिवस रात्र या लढाईत बिन्नीच्या शिलेदाराची भूमिका बजावली आहे.”

“फडणवीसांच्या कार्यक्षमतेविषयी मला जास्त बोलायला लावू नका”

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामाची स्तुती करतानाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून कार्यक्षमता आम्ही सांगलीच्या महापुरात पाहिली. भीमा कोरेगाव दंगलीतही त्यांची कार्यक्षमता पाहिली. तेव्हा महाराष्ट्र् जळत होता. त्यात मला फार बोलायला लावू नका. सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवं.”

ही लढाई देशाची लढाई आहे हे विरोधी पक्षाने कधी समजून घेतलं नाही. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षात बसावं लागलं आणि कायम बसावं लागेल, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.