राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत

| Updated on: Jan 26, 2021 | 4:50 PM

"राजपथावर आमच्या सैन्याचं सामर्थ्य दिसतं. मात्र आज दिल्लीच्या रस्त्यावर आज जे चित्र दिसलं ते ना आंदोलकांना शोभा देतं, ना सरकारला", अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज शरम दिसली : संजय राऊत
संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत 'टीव्ही 9 मराठी'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण दिल्लीत आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या विचारात असल्याचे सांगितले.
Follow us on

मुंबई : “राष्ट्रीय शरमेची ही बाब आहे. आज प्रजासत्ताक दिवस आहे. पूर्ण देश, पूर्ण विश्व आपल्या शक्तीचं, ताकदीचा अनुभव घेत असतं. राजपथावर आमच्या सैन्याचं सामर्थ्य दिसतं. मात्र आज दिल्लीच्या रस्त्यावर आज जे चित्र दिसलं ते ना आंदोलकांना शोभा देतं, ना सरकारला. दोन महिन्यापासून शांततेने आंदोलन सुरु होतं. जगभरात त्याचं कौतुक होतं. शेतकऱ्यांचं इतकं शिस्तबद्ध आंदोलन जगात कुठे झालं नाही. आज अचानक काय झालं? शेतकऱ्यां चा संयमाचा बांध फुटला. त्यांनी थेट लाल किल्ल्यावर कूच केली. सरकार काय करत होतं? सरकार याच दिवसाची वाट पाहात होतं का? शेतकऱ्यांचा संयमाचा बांध तुटणार होता, तर ती सरकारचीही जबाबदारी होती. आजची ट्रॅक्टर रॅली रोखून शेतकऱ्यांना नीट घरी जाऊ दिलं असतं”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी दिली (Sanjay Raut on Delhi Farmer Tractor rally violence).

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“शेतकऱ्यांचा संयम तुटत असताना सरकारची काही जबाबदारी नव्हती का? कायदा नेमका कुणासाठी, शेतकऱ्यांचं ऐकलं जात नसेल तर तो कायदा कुणासाठी झालाय? दिल्लीच्या रस्त्यावर आज अराजकता निर्माण झाली आहे. पंजाब अशांत व्हावा, पंजाबच्या लोकांना खलिस्तानी ठरवून अराजकता निर्माण करावी हे षडयंत्र आहे का? आज हे घडायला नको होतं. सरकारने या गोष्टीची जबाबदारी घ्यायला हवी”, असं संजय राऊत म्हणाले.

“या ठिकाणी दुसरा पक्ष असता किंवा इतर कोणत्या राज्यात हा प्रकार घडला असता तर राजीनामा मागितला गेला असता. आज जी घटना घडली त्याबद्दल कुणाचा राजीनामा मागणार? सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवारांचा राजीनामा मागणार का की जो बायडनचा राजीनामा घेणार? कोण घेणार याची जबाबदारी?”, असे सवाल त्यांनी केले.

“सरकारच्या अहंकारामुळे हे घडत आहे. सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणावी हे आमचं आवाहन आहे. काल मुंबईत हजारो शेतकरी आले, पण आम्ही परिस्थिती नियंत्रणात ठेवली”, असं संजय राऊत म्हणाले.

“अमित शहांचा राजीनामा मागितला नाही. दिल्लीत इतर कुणाचं सरकार असतं राजीनामा मागितला गेला असता. सोनिया गांधीचा राजीनामा मागितला असता. महाराष्ट्रात घडलं असतं तर उद्वव ठाकरेंचा राजीनामा मागितला असता”, असं राऊत म्हणाले.

“जाणूनबुजून आणीबाणीची परिस्थिती निर्माण केली जात आहे. गेल्या वर्षी शाहीनबागच्या निमित्ताने ही परिस्थिती निर्माण केली होती. वारंवार अशी परिस्थिती निर्माण करणं हा लोकशाहीला धोका आहे”, असा घणाघात त्यांनी केला.