Sanjay Raut : भावना गवळी उत्तम काम करत होत्या, मात्र…; शिवसेनेचं प्रतोदपद राजन विचारेंना देण्याचं राऊतांनी सांगितलं कारण

ईडीकडून सध्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. अडसूळ यांच्या घरावर ईडीच्या धाडी टाकल्या जात होत्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut : भावना गवळी उत्तम काम करत होत्या, मात्र...; शिवसेनेचं प्रतोदपद राजन विचारेंना देण्याचं राऊतांनी सांगितलं कारण
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 07, 2022 | 10:35 AM

मुंबई : राजन विचारे (Rajan Vichare) खासदार आहेत. ठाण्याचे आमदार होते, नगरसेवक होते. आनंद दिघे यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. लोकसभेत मुख्य प्रतोद म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुढील काही काळामध्ये कामे वेगात व्हावी यासाठी राजन विचारेंची नेमणूक करण्यात आली आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. नाशिक दौऱ्याला निघण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेने मुख्य प्रतोद म्हणून राजन विचारेंची निवड केली. त्याविषयी ते म्हणाले, की भावना गवळी यांची सध्या कायदेशीर (Legal) लढाई सुरू आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये त्यांना हजेरी लावणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वांशी बोलून विचारेंची निवड करण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले.

‘सगळ्यांशी बोलूनच निर्णय’

भावना गवळी उत्तम काम करत होत्या. मात्र त्यांच्या कायदेशीर लढाया सुरू असल्यामुळे पार्लमेंटमध्ये त्यांना नेहमी येणे शक्य होत नाही. तेव्हा पार्लमेंटमध्ये चीफ व्हीप म्हणून कोणीतरी हजर असायला पाहिजे. गटनेते म्हणून विनायक राऊत आहेतच मात्र चीफ व्हीपची गरज असतेच. राजन विचारे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे सगळ्यांशी बोलून उद्धव ठाकरे यांनी प्रतोदपदाचा हा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी झाली, असे संजय राऊत यांनी सांगितले.

‘ईडीकडून अनेक नेत्यांवर दबाव’

ईडीकडून सध्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. अडसूळ यांच्या घरावर ईडीच्या धाडी टाकल्या जात होत्या. मागील वर्षभरापासून हे सुरू आहे. याविषयी पक्षप्रमुखांशी चर्चा करणार आहोत. कारवाई चुकीची आहे, असे अडसूळ वारंवार सांगत आहेत. मात्र तरीदेखील त्यांच्यावर अशाप्रकारच्या कारवाया करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. कठोर कारवाईचा ईडीचा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. त्यांना अटक करण्याची भाषादेखील काही भाजपा नेते करत होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तर जितेंद्र नवलांनींची ईडी चौकशी थांबविली यावरही त्यांनी भाष्य केले.

काय म्हणाले संजय राऊत?